• Sun. Mar 8th, 2026
    Bachchu Kadu: भाजपकडून बदनामीचे षड्यंत्र; शेतकरी आंदोलनास ट्रोल करीत असल्याचा बच्चू कडू यांचा आरोप

    Bachchu Kadu : शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. ट्राेल करणाऱ्यांनी पुढे यावे, आंदाेलन उभारावे आम्ही आंदाेलनात कार्यकर्ते म्हणून सहभागी हाेऊ, असेही बच्चू कडू म्हणाले.

    kadu(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, अमरावती: शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही तीन दिवस नागपुरात आंदाेलन केले. सरकारने आमच्याशी चर्चा करून ३० जून २०२६पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले; परंतु साेशल मीडियावर शेतकरी आंदाेलनास ट्राेल करण्यात येत आहे. भाजपची मंडळी शेतकरी आंदाेलनास बदनाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आराेप प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

    शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, मेंढपाळ व मच्छिमारांचे प्रश्न, ग्रामसेवकांचे प्रश्न यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान ट्रॅक्टर मोर्चा काढत नागपुरात आंदोलन केले होते. यानंतर सरकारशी चर्चेअंती आंदाेलन मागे घेण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांनी रविवारी अमरावती मध्यवर्ती बँकेत पत्रपरिषद घेऊन त्यांना व आंदाेलकांना ट्राेल केले जात असल्याने तीव्र नाराजी दर्शविली. घरी बसून मेसेज करणाऱ्यांनी आता उर्वरित शेतकरी प्रश्नावर लढावे, असे आवाहन केले.
    Maharashtra Timesमोठी बातमी! शिरुरच्या पिंपरखेडमध्ये संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचं कार्यालय पेटवलं
    सरकारने आम्हाला शब्द दिला आहे. सरकारने मुदतीच्या आत कर्जमाफी केली नाही, तर संपूर्ण राज्यात हंगामा करणार आहे. कर्जमाफी हाेईपर्यंत सत्तेतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांना मत देऊ नका, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे, ‘प्रहार’चे संजय देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

    मोठे नेते आंदोलनाशी जोडले
    बच्चू कडू म्हणाले, शरद जाेशी यांच्या आंदाेलनानंतर या आंदाेलनास माेठे यश मिळाले आहे. वामनराव चटप, राजू शेट्टी, अजित नवले, रविकांत तुपकर अशी माेठी माणसे असताना ‘मॅनेज’ हाेण्याचा आराेप दु:खी करणारा आहे. कर्जमाफीच्या घाेषणेमुळे शेतकरी तणावमुक्त झाला आहे. त्याला कर्ज भरण्याचा त्रास हाेणार नाही.

    हवामहल पाहण्यासाठी सर्वांनी यावे
    आपण हवामहल बांधला असा आरोप होत आहे, तर सर्वांनी आमच्या घरी हवामहल पाहण्यासाठी यावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केले. या आरोपांना ‘प्रहार’चे कार्यकर्ते उत्तर देणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले
    Maharashtra TimesPune News: भाजपचा पालिकेवर दरोडा; ठेकेदाराचा 500 कोटींचा फायदा करुन दिल्याचा मविआचा आरोप, प्रकरण काय?
    बच्चू कडू म्हणाले…
    -आम्हाला ट्रोल करण्याचा प्रकार बंद न झाल्यास आम्ही उत्तर देणार.
    -आम्ही आजवर हजारो आंदोलने केली, आंदोलनासाठी आयुष्य पणास लावले.
    -काहीही न करणारे आम्हाला नावे ठेवत आहेत, हा प्रकार दुर्दैवी.
    -आमच्याविरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
    – ‘मॅनेज’ झालो असतो; तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले नसते.
    -मोबाइलवर बदनामी करण्यापेक्षा आंदोलनात सहभागी व्हावे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा