• Sat. Mar 7th, 2026
    अलिबागमधील समुद्रात दुर्दैवी घटना! चार जणांपैकी दोन मित्र बेपत्ता; 22 तासानंतरही शोध सुरु, आई-वडिलांचा आक्रोश

    Two Youths Missing in Alibaug Sea : अलिबागमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. समुद्रावर चार मित्रांपैकी दोनजण समुद्रात बेपत्ता झाले आहेत. काल सायंकाळी ही घटना घडली. अद्यापही या दोघांचा तपास लागलेला नाहीय.

    अलिबाग समुद्रात दोन तरुण बेपत्ता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर काल शनिवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. उलवे आणि सानपाडा येथून फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोनजण समुद्रात बुडून बेपत्ता झाले असून, दोन जणांना बचावण्यात आलं आहे. 22 तास उलटूनही बेपत्ता तरुणांचा शोध लागलेला नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय मणियार, आदर्श अभी, शशांक सिंग आणि पलाश पखर (सर्व रा. उलवे, सानपाडा) हे चार मित्र काल शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अलिबाग समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. जिल्हाधिकारी बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या समुद्र किनारी काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समुद्रात समुद्र स्नानासाठी प्रवेश केला. मात्र, अचानक आलेल्या भरतीच्या तीव्र लाटा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं चौघेही पाण्यात अडकले. त्यापैकी शशांक सिंग (वय 19) आणि पलाश पखर (वय 19) हे खोल पाण्यात वाहून गेले, तर तन्मय मणियार आणि आदर्श अभी यांनी कसाबसा किनाऱ्यावर येत जीव वाचवला.

    Maharashtra Timesमाथेरानमधले 400 घोडे झाले बेघर; पोलिस बंदोबस्तात मोठी कारवाई, अश्वपाल बांधवांचा आक्रोश, कारवाईमागचं कारण काय?

    समुद्रात शोधमोहीम सुरु

    घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस , महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन दल आणि किनारी सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच बचावकार्य सुरू करण्यात आलं, मात्र अंधार आणि प्रचंड भरतीमुळे मोहिमेत अडथळे आले. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, रोहा येथील वाइल्डलाइफ रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे. स्थानिक जीवरक्षक बंड्या सारंग, महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस पथक आणि आपत्ती व्यवस्थापन दल यांच्या मदतीने समुद्रात शोधमोहीम सुरू आहे.

    बेपत्ता तरुणांच्या शोधासाठी स्पीड बोट आणि लाइफसेव्हिंग गिअरच्या सहाय्याने विस्तृत परिसरात तपासणी सुरू आहे. तथापि, समुद्रातील जोरदार प्रवाहामुळे अडचणी येत आहेत. दरम्यान, बेपत्ता तरुणांच्या नातेवाईकांनी अलिबाग येथे धाव घेतली असून, समुद्रकिनाऱ्यावर हाहाकार माजला आहे. प्रशासनाकडून सतत शोधमोहीम राबवली जात असली तरी अद्याप दोघांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

    Maharashtra Timesकर्जत-दहिवली मार्गावर भीषण अपघात; गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोन भाविकांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

    पर्यटकांमध्ये हळहळ

    या घटनेनं अलिबाग किनाऱ्यावर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पर्यटकांमध्ये भीती आणि हळहळ पसरली असून, स्थानिक नागरिकांकडून समुद्रात सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी होत आहे. या दुर्घटनेनं रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अलिबाग पोलिसांनी नागरिकांना सूचना केली आहे की, ‘भरतीच्या वेळेत समुद्रात उतरणं टाळा. सुरक्षा फलक आणि जीवरक्षकांच्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे’.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा