• Mon. Mar 9th, 2026

    ठाकरे बंधूंनी मतदारयादीवर रान पेटवलं, आता महायुतीतील शिंदेंची शिवसेनाही आक्रमक; दंड थोपटत केली नवी मागणी

    ठाकरे बंधूंनी मतदारयादीवर रान पेटवलं, आता महायुतीतील शिंदेंची शिवसेनाही आक्रमक; दंड थोपटत केली नवी मागणी

    Nashik News: राजकीय पक्षांनी सदोष मतदार याद्यांवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलेलं असताना नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने तीन लाख बोगस व दुबार मतदार असल्याचा आरोप केला आहे. दुबार नावे वगळण्याची, मृत व्यक्तींची नावे काढण्याची व कुटुंब एकत्रीकरण मतदार प्रणाली लागू करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

    महायुतीतील शिंदेंची शिवसेनाही आक्रमक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक: राज्य पातळीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदोष मतदारयाद्यांवर जोरदार रान पेटवलेलं आहे. या दोघांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकतेच मुंबईत सत्याचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या माध्यमातून निवडणूक आयोग ाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. विरोधातील राजकीय पक्षांकडून या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं जात असताना सत्ताधारी महायुतीतील शिवसेनेनंही आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दुबार मतदारांविरोधात दंड थोपटले आहे. नाशिक शहरातील साडेतीन विधानसभा मतदारसंघात जवळपास तीन लाख बोगस आणि दुबार मतदार असल्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुराव्यानिशी करण्यात आला आहे.

    निवेदनामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कायदा सेलकडून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुबार नावे, जिल्ह्यातील अन्य भागातील नावे विशिष्ट विधानसभा मतदारसंघात टाकणे, मृत तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे दोन ठिकाणी असणे, असे अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यावर सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनामधून उपाय सुचवण्यात आले असून देशासह राज्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघात दुबार नावे वगळावीत. सध्या अनेक मतदारसंघांमध्ये एकाच व्यक्तीची नावे दोन किंवा अधिक वेळा नोंदवली गेल्यामुळे दुबार नावांची त्वरित तपासणी आणि पंचनामे करून ती वगळण्यात यावीत. एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघातच असावे याची खात्री करण्यात यावी, असं म्हणण्याता आलं आहे.

    दरम्यान, “आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुबार नावांची छाननी केली जावी. अनेक कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांत किंवा विभागांत चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आली आहेत. कुटुंब एकत्रीकरण मतदार करण्याची प्रणाली राबवली जावी. एकाच ठिकाणी वास्तव्य असलेल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींची नावे एकाच मतदारयादीत देण्यात यावीत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज आणि सुधारणा केंद्र सुरू करावीत. मृत व्यक्तींची नावे वगळावी, यासाठी नागरी नोंदणी कार्यालय आणि मतदारयाद्यांचा डेटा जोडून मृत व्यक्तींची नावं स्वयंचलित वगळावी. मतदार नावे योग्य मतदान केंद्रातच असावीत, आयोगाने याद्यांचे पुनरावलोकन करून अशा त्रुटी दूर कराव्या. मतदार नोंदणी करताना आधार, पॅन आणि जन्म दाखला यांसारख्या अधिकृत दस्तऐवजांचा आधार घ्यावा. मतदार ओळखपत्रावरील फोटो स्पष्ट असायला हवेत. मतदारासाठी बायोमॅट्रिक कार्ड असावे आणि आधारशी जोडणे अनिर्वाय करावे. मतदाराचे बायोमॅट्रिक आधारित ओळखपत्र करावं,” अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा