• Fri. Mar 20th, 2026
    Uddhav Thackeray: पुराव्यांनिशी आता न्यायालयात जाणार; ‘सत्याचा मोर्चा’मध्ये उद्धव ठाकरे यांची घोषणा

    Uddhav Thackeray Satyacha Morcha: फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय अशा निघालेल्या या मोर्चासमोर भाषण करताना उद्धव यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले.

    thackeray(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यातील मतदारयाद्यांमधील घोळाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेतर्फे शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुराव्यांनिशी न्यायालयात जाण्याची घोषणा केली. आम्ही येत्या काही दिवसांत पुरावे घेऊन न्यायालयात जाणार आहोत, न्यायालयात तरी न्याय मिळतो का हे पाहू. इतके साक्षीपुरावे दिल्यानंतर तरी न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    निवडणूक घोळाविरोधात न्यायालयात जाऊ, पण न्यायालयातही न्याय मिळाला नाही, तर जनतेचे न्यायालय सक्षम आहे. जनतेनेच आता जबाबदारी घ्यावी आणि मतचोर दिसला की त्याला लोकशाही मार्गाने फटकवावे, असे सांगतच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच सगळ्या राजकीय पक्षांची एकजूट झाली आहे. ही केवळ विरोधी पक्षांची नाही, तर लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या पक्षांची एकजूट आहे. आज केवळ ठिणगी बघताय; मात्र या ठिणगीचा वणवा कधीही भडकू शकतो, असे उद्धव म्हणाले. आता जागे राहा, नाही तर ॲनाकोंडा येईल, अशा शब्दांत ठाकरे पुन्हा एकदा शहा यांच्यावर बरसले. मतदार याद्यांबाबत रोज पुरावे येत आहेत. तरीही निवडणूक आयोग काही करत नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
    Maharashtra TimesRaj Thackeray: दुबार-तिबारवाले मतदार आढळल्यास तिथेच फोडून काढा, राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, ‘बडव-बडव बडवायचे आणि…’
    त्यांना फोडून काढा
    दुबार मतदारांबाबत सगळेच तक्रार करीत आहेत. आता सर्वांची जबाबदारी आहे, की घराघरांत जा, याद्यांवर काम करा. या दुबार मतदारांचे चेहरे कळले पाहिजेत. त्यानंतरही जर समजा दुबार-तिबार मतदार मतदानाला आले, तर त्यांना तिथेच फोडून काढा. बडवून मगच पोलिसांच्या ताब्यात द्या, असे आक्रमक आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

    पाच वर्षे झाली, तरी निवडणुका नाहीत. मग आता निवडणूक घेण्याची घाई कशाला? मतदारयाद्या साफ करा. त्या पूर्ण पारदर्शक केल्यानंतर जेव्हा निवडणुका होतील, त्यात यश-अपयश सगळ्या गोष्टी मान्य असतील. मतदारयाद्यांतील घोळांबाबत केवळ आम्ही विरोधी पक्ष नाही, तर सत्ताधारी भाजप, शिंदे गट,अजित पवार गट सगळेच बोलत आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले.
    Maharashtra Timesखोटेपणा सिद्ध करणाऱ्यालाच जेल, शासनाचं मिळतंय संरक्षण, आता जबाबदारी.., शरद पवारांचा एल्गार
    आयोगाचे बोगस उत्तर
    काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही भूमिका मांडली. बोगस मतदार याद्यांबाबत आयोगाने दिलेले उत्तर हे इतिहासातील बोगस उत्तर म्हणून गणले जाईल, असे थोरात म्हणाले. जी मतदार यादी विधानसभा निवडणुकीत वापरली, ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरू नका, अशी भूमिकाही थोरात यांनी मांडली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा