• Sat. Mar 7th, 2026
    माथेरानमधले 400 घोडे झाले बेघर; पोलिस बंदोबस्तात मोठी कारवाई, अश्वपाल बांधवांचा आक्रोश, कारवाईमागचं  कारण काय?

    Horse shed demolition,Matheran: माथेरानच्या दस्तुरी नाका परिसरात प्रशासनाने कारवाई करत ४०० घोड्यांचे शेड हटवले आहेत. यामुळे घोडे व्यवसाय करणाऱ्या अश्वपाल समाजात संताप निर्माण झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    माथेरान (रायगड), अमुल कुमार जैन: माथेरान गिरीस्थान हिरवाईने नटलेले, मुंबई-पुणेकरां सहित देश विदेशातील पर्यटकांना आवडणारे पर्यटनस्थळ आहे, पण या सुंदर डोंगरमाथ्यावरील शांती आणि पर्यटनाचा ताल आज विस्कळीत झाला आहे. माथेरानच्या दस्तुरी नाका परिसरात आज प्रशासनाने संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईमुळे तब्बल 400 घोडे बेघर झाले असून, घोडे व्यवसायावर आपलं जीवन अवलंबून ठेवणाऱ्या अश्वपाल समाजात प्रचंड संताप उसळला आहे.

    नगरपालिका आणि महसूल विभागाने भूखंड क्र. 93 वर उभारण्यात आलेले घोड्यांचे प्लास्टिक शेड हटवले आहे. या जागेवर अश्वपाल समाज मागील अनेक वर्षांपासून तबेले उभारून घोड्यांची देखभाल करत होता. मात्र, वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या कारणावरून प्रशासनाने मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई केली. परिणामी, माथेरानमधील मालवाहतूक, पर्यटन सेवा आणि स्थानिक व्यावसायिकांचे अर्थचक्रच ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.

    Maharashtra Timesकर्जत-दहिवली मार्गावर भीषण अपघात; गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोन भाविकांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

    माथेरान हे भारतातील एकमेव ‘नो व्हेईकल झोन’ क्षेत्र आहे. येथे वाहनबंदी असल्याने, हॉटेल्ससाठी अन्नपदार्थ, बांधकाम साहित्य, जीवनावश्यक वस्तू तसेच पर्यटकांची मालवाहतूक ही पूर्णपणे घोड्यांवर अवलंबून असते. त्यामुळे घोड्यांचा व्यवसाय हा या प्रदेशाच्या अर्थचक्राचा अविभाज्य भाग बनला आहे. पण आता या घोड्यांना निवारा उरला नाही, त्यामुळे अश्वपाल समाज अक्षरशः उघड्यावर आला आहे.

    या कारवाईविरोधात अश्वपाल संघटनेच्या महिलांनी दस्तुरी नाक्यावर मोठा आक्रोश केला. “आमच्या घोड्यांसाठी कायमस्वरूपी तबेल्यांची जागा उपलब्ध करून द्यावी,” अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर रोष व्यक्त करत विचारलं की “आमचे घोडे ऊन-पावसात, हिवाळ्यात कोठे राहणार? त्यांची काळजी कोण घेणार?” दरम्यान, स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी वर्गातही चिंता पसरली आहे. कारण घोड्यांशिवाय माथेरानमधील सर्व मालवाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पर्यटनावर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

    अश्वपाल समाजाचा उपजीविकेचा आधार हिरावल्यामुळे संपूर्ण माथेरान हादरलं आहे. प्रशासनाच्या निर्णयावरून आता राजकीय स्तरावरही चर्चा रंगू लागली आहे. वारसा जपणाऱ्या माथेरानच्या या घोड्यांचा विस्थापितपणा पर्यटनाचं भविष्य बिघडवणार का? असा प्रश्न आता उभा राहिला आहे..

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा