• Fri. Mar 6th, 2026

    Raj Thackeray: दुबार-तिबारवाले मतदार आढळल्यास तिथेच फोडून काढा, राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, ‘बडव-बडव बडवायचे आणि…’

    Raj Thackeray: दुबार-तिबारवाले मतदार आढळल्यास तिथेच फोडून काढा, राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, ‘बडव-बडव बडवायचे आणि…’

    Raj thackeray speech मुंबईत महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील घोळाविरोधात सत्याचा मोर्चा काढला. हजारो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. यावेळी राज ठाकरेंनी झंझावाती भाषण केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: आज मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि त्यांच्या समर्थक पक्षांनी सत्याचा मोर्चा आयोजित केला होता. हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील घोळाविरूद्ध होता. यावेळी हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चात विरोधकांची एकजूटही पाहायला मिळाली. मोर्चाला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनेसेप्रमुख राज ठाकरे , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या मोर्चात सर्वांनी निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार भाषणं केली. मतदार याद्या स्वच्छ करा मग निवडणुका घ्या, दुबार मतदारांची नावे हटवा अशी मागणी करण्यात आली आहे.

    यावेळी राज ठाकरेंनीही घणाघाती भाषण केलेले पाहायला मिळाले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल केला. त्यांनी मतदारयाद्यांमधला घोळ स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी यावेळी जे लोकं निवडणूक आयोगात घुसले आहेत. त्यांच्याकडून निवडणुका जिंकून घेतल्या जात असल्याचा आरोप केला आहे. “याला काय निवडणुका म्हणतात का? एक आमदार स्वतः सांगतो की मी 20 हजार मत बाहेरुन आतमध्ये आणली. म्हणजे यांची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

    Maharashtra TimesNagpur News: कार्यालयीन कलह व छळाने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, खुर्चीसाठी धुसफूस करणाऱ्या शोभा मुधोळ आरोपांच्या घेऱ्यात

    “मतदारयाद्या तपासताना मुलीचं वय १४, वडिलांचं वय 143, काहीही चालू आहे. नवी मुंबईमध्ये आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेले आहेत. कोणी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला आहे. कुठेही बसलेला दिसला की नोंदवायचा का?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

    राज ठाकरेंनी ‘सत्याचा मोर्चा’मध्ये मतदार याद्यातील घोळाबाबत बोलताना दुबार-तिबारवाले मतदार दिसताच फोडून काढणार, असा इशाराच दिला आहे. ते म्हणाले की, निवडून आलेले लोकही स्वतःला चिमटे काढून बघत होते. हे सगळे असे प्रकार सुरु आहेत. कशा निवडणुका घ्यायाच्या मला जरा सांगा. जो मतदार रांगेत उभा राहून मतदान करतो. त्याच्या मताला काय किंमत आहे. आधीतर तुम्ही या गोष्टी घरोघरी पोहोचवा, मतदार याद्यांमध्ये कसा घोळ सुरु आहे याबद्दल जनजागृती करा आणि त्यानंतरही जर समजा हे दुबार तिबारवाले मतदान सुरु असताना तिथे आले तर तिथेच फाडून काढायचे. बडव-बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये चाललेला हा प्रकार थांबणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

    यावेळी त्यांनी मतदार यादीत किती दुबार-तिबार मतदार आहेत, याची माहिती देणारी कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी ही सर्व कागदपत्रे असलेला गठ्ठाही सोबत आणलेला यावेळी पाहायला मिळाला. हजारो मतदारांनी दुबार मतदान केले आहे, आजचा मोर्चा ताकद आणि राग दाखवण्यासाठी आहे, असे ते म्हणाले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा