Eknath Khadse Burglary: जळगावातील माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरात मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली. पथदिवे बंद असताना आणि वॉचमन सुट्टीवर असताना ही घटना घडली.
खडसे मुंबईत असताना चोरी झाल्याचे समजताच ते तातडीने घरी परतले. घराची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “ही फक्त चोरी नाही, ही नियोजनबद्ध घटना आहे. माझ्या बेडरूममध्ये महत्त्वाची कागदपत्रे होती, आणि तीच गायब झाली आहेत. म्हणजेच माझ्या घराबाबत माहिती असलेल्या कुणालातरी हे ठाऊक होते.”
एकनाथ खडसेंच्या बंगल्यात मध्यरात्री चोरटे घुसले; कॅश आणि सोन्याचे दागिनेही लंपास, किती मुद्देमाल पळवला?
त्यांनी पुढे सांगितले की, भ्रष्टाचाराशी संबंधित काही कागदपत्रे, जी त्यांनी माहिती अधिकारातून मिळवली होती, तीच चोरीस गेली आहेत. “ही साधी चोरी नाही. सोने किंवा रोकडपेक्षा कागदपत्रे आणि सीडीवर त्यांचा डोळा होता,” असं खडसे म्हणाले.
पथदिवे बंद, वॉचमन सुट्टीवर
घटनेच्या रात्री 12 वाजून 37 मिनिटांनी परिसरातील पथदिवे बंद करण्यात आले होते. त्या काही क्षणांनंतरच चोरी झाल्याचं खडसे यांनी सांगितलं. “ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही. माझ्या घराभोवतीची रेकी आधीच झाल्याची शक्यता आहे,” असं त्यांनी नमूद केलं. त्याचवेळी दिवाळी निमित्ताने वॉचमन सुट्टीवर होता. त्यांनी हेही स्पष्ट केलं की पेन ड्राईव्हमध्ये फक्त गाणी होती, तरीही ती चोरीस गेली आणि सीडीमध्ये वैयक्तिक गोष्टी होत्या.
निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच चढाओढ, महायुतीत खदखद; गुलाबराव-महाजनांच्या प्रतिक्रिया
घटनेच्या पार्श्वभूमीवर खडसे यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “माझ्या घरातच नाही, तर रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडे पडले आहेत. पोलिसांचा वचक संपलाय, ते फक्त हप्ते खाण्यात व्यस्त आहेत. वाळूतस्करी वाढली आहे,” असा त्यांनी रोखठोक आरोप केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांकडे तीन बॅग असल्याचं दिसत असल्याचं खडसे यांनी सांगितलं.

