• Sat. Mar 7th, 2026

    Satara Crime: साताऱ्यातील डॉक्टर तरुणीने जीवन संपवलं की घातपात झाला? पोस्ट मॉर्टम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या हाती, तिच्या शरीरावर…

    Satara Crime: साताऱ्यातील डॉक्टर तरुणीने जीवन संपवलं की घातपात झाला? पोस्ट मॉर्टम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या हाती, तिच्या शरीरावर…

    Satara Doctor Postmortem Report: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने खळबळ उडाली असून आत्महत्येपूर्वी तिने बलात्काराचा आरोप केला होता.

    साताऱ्यातील डॉक्टर तरुणीने जीवनं संपवलं की घातपात झाला? पोस्ट मॉर्टम रिपोर्ट अखेर समोर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली. या तरुणीने आपल्यावर बलात्कार झाल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहीत जीवन संपवलं. मात्र ही आत्महत्या आहे की तिची कोणी हत्या केली, याबाबतचे तर्क-वितर्क लढवले जात होते. या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही धार आली. डॉक्टरची आत्महत्या नसून, संस्थात्मक हत्या आहे, असा आमचा दाट संशय असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे तरुणीच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून नेमकी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. हा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या हाती आला असून गळफास घेतल्यानेच तरुणीचा मृत्यू झाल्याचं सदर रिपोर्टमधून उघड झालं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, फलटणमधील हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. याबाबतचा अहवाल आता रुग्णालयाकडून पोलिसांना सोपवण्यात आला आहे. यामधून तरुणीचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचं स्पष्ट झाल्याचे समजते. तसंच तरुणीच्या शरीरावर कसल्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टर तरुणीला होत असलेल्या त्रासातून तिने आपले जीवन संपवल्याचं या रिपोर्टमध्ये आढळलं आहे.

    तरुणीच्या मृत्यूवरून कोणता आरोप?

    “फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या नसून, संस्थात्मक हत्या आहे, असा आमचा दाट संशय आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या दबावातून हा प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांमना क्लीन चिट देण्याची घाई करू नये. क्लीन चिट म्हणजे पोलिसांनी तपास थांबवण्याचे अलिखित संकेत आहेत,’ असा गंभीर आरोप शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी चौकशीसाठी उच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याची मागणीही सुषमा अंधारे यांनी केली आहे.

    दरम्यान, ‘बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार रणजीतसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या साखर कारखान्यासाठी आणत होते. कामगार कारखाना सोडून जाऊ नयेत यासाठी कामगारांच्या तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव टाकला जात असे. यासंदर्भात संबंधित डॉक्टर तरुणीने वरिष्ठांनाही पत्र दिले होते,’ असा आरोप करण्यात आला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा