Devendra Fadnavis: शंकरनगरातील धरमपेठ क्रीडा मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर रविवारी राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यासाठी आले असता मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी एसआयआरबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, हा अत्यंत चांगला निर्णय आहे. देशातील मतदारयाद्यांची सखोल फेरतपासणी गेल्या २५ वर्षांपासून झाली नव्हती. यासंदर्भात २०१२मध्ये मीच उच्च न्यायालयात गेलो होतो. आता सखोल तपासणी होणार आहे, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. आता एसआयआर तयार झाल्यानंतर याद्या ब्लॉक चेन पद्धतीने तयार करण्यात याव्यात. प्रत्येक मतदाराचा आयडी विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात यावा. जेणेकरून ते इतर राज्यांत गेले, तरी त्या आयडीवरून मतदान करू शकले पाहिजेत.
निवडणूक आयोगाच्या ‘पुनर्निरीक्षण’ निर्णयाचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत; विरोधक ‘कव्हर फायर’ करत आहेत म्हणत लगावला टोला
राहुल गांधींना काहीच माहिती नसते
फलटण येथील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या ही संस्थागत हत्या असल्याचा प्रकार आहे, या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांना कोणत्याही घटनेची पूर्ण माहिती नसते. ते ‘एक्स’वर पोस्ट करण्यापूर्वी कुठलीहा माहिती ते घेत नाहीत. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने तिच्या हातावर लिहून ठेवले आहे. यातून हे प्रकरण पूर्णपणे स्पष्ट होते. तसेच यात दोषी असलेल्यांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला केवळ संवेदनशील घटनांचा आधार घेऊन राजकीय पोळ्या कशा शेकता येतील, हेच दिसते.

