Karjat Bull Attack: ऐन दिवाळी कर्जतमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. बिथरलेल्या बैलाने केलेल्या हल्ल्यात ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. घटनेनं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
कर्जतनजीक दहिवली गावातील संजयनगर आणि छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात एका बैलाने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी सकाळी अर्जुन म्हसे (७०) यांच्यावर बैलाने हल्ला केला. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान म्हसे यांचा मृत्यू झाला. एका दुचाकीस्वारालाही बैलाने धडक दिली. बिथरलेला हा बैल अचानक कोणावरही हल्ला करतो. त्याने दिलेल्या धडकेत आदित्य कनोजिया (९), मंजुळा चव्हाण (६५) आणि योगिता थोरवे (४४) हे तिघे जण जखमी झाले. त्यातील मंजुळा चव्हाण या जबर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Maharashtra Weather: राज्यात दोन दिवस पावसाचे! ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट जारी, काय सांगतो IMDचा अंदाज?
बैलाला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांनी खोपोली येथील सामाजिक संघटनेच्या बचाव पथकाला पाचारण केले. बैलाला पकडण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले. बैलाच्या हल्ल्यात दोन दिवसांत पाच जण जखमी झाल्याचे माजी नगरसेवक संकेत भासे यांनी सांगितले.
Devendra Fadnavis: दिल्ली अजून दूर, 2029पर्यंत मीच…; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा
तर दुसरीकडे, अक्सा समुद्रात एक जणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालाडच्या अक्सा समुद्रात चार जण बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी लाटांमुळे सर्वजण गटांगळ्या खाऊ लागले. यातील तीन जण सुखरूप बाहेर पडले. तर १३ वर्षीय मयांक बेपत्ता झाला. त्याचा शोध सुरू करण्यात आला, मात्र त्याचा मृतदेह हाती लागला.

