• Thu. Jun 11th, 2026

    विरोधकांनी कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या तरी…; महापालिका निवडणुकांपूर्वी शिंदेंचं ओपन चॅलेंज, काय म्हणाले?

    विरोधकांनी कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या तरी…; महापालिका निवडणुकांपूर्वी शिंदेंचं ओपन चॅलेंज, काय म्हणाले?

    Eknath Shinde: विरोधक निवडणुका घेऊ नका अशी विनंती करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे. निवडणूक झाली, की महायुतीचा बॉम्ब थेट त्यांच्या खुर्चीखाली फुटेल, असा टोला शिंदे यांनी लगावला.​​

    eknath shinde diwali pahat(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही! कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचे राजकीय अस्तित्व उडून जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात दिला. महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणून आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमचीच सत्ता येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाण्यातील विविध दिवाळी पहाट कार्यक्रमांना शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.

    विरोधक दररोज आरोपांचे फटाके फोडतात, परंतु त्यांच्या त्या फुसक्या लवंग्यांचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही! आम्ही कामगिरीच्या ॲटम बॉम्बने महाराष्ट्र उजळवणार आणि विरोधकांचा धुरळा उडवणार आहोत. आमचे लक्ष विकासावर आहे; आणि विरोधकांचे काम फक्त आरोप, टीका करणे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होते.
    Maharashtra Times‘बदलापुरात 17000 बाहेरचे मतदार, मतदान करायला आलात, तर चोप देऊ’, शिंदेंच्या शहरप्रमुखाचा इशारा
    शेतकरी संकटात असताना शिवसेना आणि महायुती सरकार त्यांच्यासोबत उभे आहे. आम्ही दिलेले वचन पाळले. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीचा पैसा पोहोचतोय. या पुरात धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या गाई वाहून गेल्या, त्या शेतकऱ्यांना १०१ दुभत्या गायी देण्याचाही निर्णय परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे.
    Maharashtra TimesThane News : ‘आता वेळ आली, या कार्यसम्राटांना फाटकी शाल अन्…’ भाजपच्या बॅनरची चर्चा, शिंदेंच्या सेनेला डिवचलं
    शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणे ही आमची संस्कृती आहे, असे ते म्हणाले. संकटात धावून जाणे हे आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी शिकवले आहे. त्यामुळे आम्ही केवळ बोलत नाही, कृती करून दाखवतो. पूर परिस्थितीत केंद्राने मोठी मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तक्षेपामुळे ती शक्य झाली, असे शिंदे यांनी नमूद केले.

    विरोधकांना पराभव दिसू लागला
    विरोधकांना आता पराभव दिसू लागला आहे. म्हणूनच ते निवडणूक आयोग, ईव्हीएम, महायुती आणि आम्हाला दोष देतात. निवडणुका होऊ शकल्या नाहीत कारण सर्वोच्च न्यायालयात याचिका होती. त्याला आम्ही जबाबदार नाही, असे शिंदे म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा