• Sun. Mar 15th, 2026

    Raj Thackeray: तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ, मॅच फिक्स आहे; राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले, सत्ताधाऱ्यांनाही ऐकवलं

    Raj Thackeray: तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ, मॅच फिक्स आहे; राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले, सत्ताधाऱ्यांनाही ऐकवलं

    Raj Thackeray News: राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीत घोळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत विधानसभेच्या निवडणुकीनंतर ९६ लाख बोगस मतदार भरले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. इतकंच नाही तर, तुम्ही मतदान करा किंवा नका करुन निकाल ठरला आहे, असंही ते म्हणाले. रविवारी मुंबईतील नेस्को मैदानावर बोलाताना त्यांना सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाचा खरपूस समाचार घेतला.

    ज्याप्रकारचा गोंधळ सुरु आहे मतदान याद्यांमध्ये आताचा नाही, गेल्या काही वर्षांचा आहे. २०१६-१७ ला मी याविरोधात आवाज उठवला होता. व्होटिंग मशीन, मतदार याद्यांबाबत आवाज उठवला होता. ज्यावेळी प्रत्येकाच्या दारावर टकटक व्हायला लागली, तेव्हा कळालं की काय प्रकार सुरु आहेत निवडणुकीचे. आता विधानसभेत २३२ आमदार निवडणून आले, तरी महाराष्ट्रात सन्नाटा होता. मतदार तर आवाक् झालेच होते, पण निवडून आलेलेही आवाक् झाले होते, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

    सगळ्यांनाच कळालं की, कशा निवडणुका चालल्या आहेत या देशात. अनेकजण म्हणतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण मतं येत नाहीत. असं सरु राहिल तर कसं येईल मतामध्ये. राज्यातील स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम सुरु आहे. अशा मतदारयादा तयार करायच्या, माणसं घुसवायची, असं राज ठाकरे म्हणाले.

    मला तर कळालं आहे, आगामी निवडणुकांपूर्वी जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. अशा निवडणुका होणार आपल्या देशात, कशाला निवडणूक लढायच्या, पैसे खर्च करायचे, कशाला मतदारांनी मतदान करायचं, हा मतदारांचा अपमान आहे. तुम्ही मतं द्या नाहीतर नका देऊ मॅच फिक्स आहे, अशा निवडणुका होणार. हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र आहे, कोणत्या प्रकारची लोकशाही आहे. मग म्हणायचं यांचा एकही आमदार निवडून आला नाही. अरे येणार कसा, जर मतदार याद्यांमध्ये गणित सेट असतील तर निकाल आधीच ठरलेला आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

    निवडणूक आयोगाला या याद्या सुधारा म्हणतोय, मला कळत नाही, सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडत आहेत. लागतंय ना कुठेतरी. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात. तुम्हाला कोणी विचारलं. तुम्हाला राग येतोय कारण तुम्ही शेण खाऊन ठेवलं आहे. सगळ्यांना माहितीये की ही सत्ता कशी आली. कशाप्रकारचं राजकारण सुरु आहे. हीच माणसं जेव्हा विरोधात होते, तेव्हा तेच बोलायचे जे मी आता बोलतोय, असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा