• Thu. Mar 12th, 2026
    बदलापूर, कर्जत, खोपोली मार्गावरील लोकल दररोज उशिराने, बदलापूर स्थानकांत प्रवाशांचा उद्रेक, स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव

    Central Railway Local Train Delay : मध्य रेल्वेवरील बदलापूर, कर्जत, खोपोली या मार्गावरील लोकल ट्रेन दररोज उशिराने धावत आहेत. यामुळे नोकरदार प्रवाशांना कामावर वेळेवर पोहोचता येत नसून दररोज लेटमार्क होत असल्याचा त्याचा नोकरीवरही परिणाम होतो.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    बदलापूर : मध्य रेल्वेवर बदलापूर, कर्जत, खोपोली लोकल ट्रेन दररोज 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतात. सकाळी ५ वाजल्यापासूनच्या लोकल ट्रेनपासून ते दुपारसह रात्रीपर्यंत सर्वच ट्रेनसाठी दररोज विलंब होतो. मध्य रेल्वेच्या कर्जत मार्गावर असलेल्या लोकल ट्रेनच्या सततच्या विलंबामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. सततच्या उशिरा असलेल्या ट्रेनला कंटाळलेल्या नोकरदारांचा अखेर मंगळवारी संताप अनावर झाला.

    सकाळच्या वेळेत ट्रेन 45 मिनिटं उशिरा

    सकाळच्या कार्यालयीन वेळेत ट्रेन तब्बल ४५ मिनिटं उशिरा धावत असल्याने संतप्त प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव घालत तीव्र नाराजी, मोठा संताप व्यक्त केला. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ऑफिसला ‘लेटमार्क’ होत असून, त्याचा नोकरीवर परिणाम होत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांनी व्यक्त केल्या.
    Maharashtra Timesसमृद्धी महामार्ग थेट ठाण्यात जोडला जाणार; भिवंडीतून कसा असेल मार्ग? विनाअडथळा मुंबईत प्रवेश करता येणार

    लोकल ट्रेन वेळेत न काढता आधी एक्सप्रेसला मार्ग करुन दिला जातो

    बदलापूर रेल्वे स्थानकावरून सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी सुटणारी लोकल मंगळवारी नियमित वेळेपेक्षा बराच उशिराने दाखल झाली. त्याआधी एक्स्प्रेसला प्राधान्य दिल्यामुळे ही लोकल खोपोलीहून येताना सायडिंगला थांबवण्यात आली, असा आरोप प्रवासी करत होते. परिणामी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. या संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव घालत जाब विचारला. मंगळवारचा प्रकार हा अपवाद नसून, अनेक महिन्यांपासून हीच परिस्थिती आहे. मात्र तरीही रेल्वे प्रशासनाकडून समाधानकारक उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा प्रवाशांचा आरोप आहे.

    Central Railway च्या फेऱ्या वाढणार, मात्र प्रवाशांना होणार मनस्ताप; फक्त CSMT Kalyan फास्ट ट्रेन?

    बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत येथून दररोज लाखो प्रवासी मुंबईकडे प्रवास करतात. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत लोकलची संख्या कमी असून, तांत्रिक बिघाड, सिग्नल यंत्रणेतील अडथळे आणि इतर रेल्वे कामांमुळे ज्या कमी ट्रेन आहेत, त्यादेखील लोकल वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संतप्त प्रवाशांनी याबाबत सोशल मीडियावरही आपला रोष व्यक्त केला असून, रेल्वे प्रशासनावर तीव्र टीका केली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा