• Wed. Mar 11th, 2026

    सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे दोन वर्षात नागरी विमानतळ पूर्ण करण्याचा शासनाचा संकल्प – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 14, 2025
    सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे दोन वर्षात नागरी विमानतळ पूर्ण करण्याचा शासनाचा संकल्प – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद




    • शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा
    • विमानतळ प्राधिकरण करणार व्हिजिबिलिटी सर्व्हे

    मुंबई, दि. १४ : सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून व्हिजिबिलिटी सर्व्हे करुन याठिकाणी येत्या दोन वर्षात विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कार्गो व नागरी विमानतळ उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ६६.३६ हेक्टर क्षेत्राव्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

    मंत्रालय येथे सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विश्वजीत कदम, सुहास बाबर, एमआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख, उद्योग विभागाचे सहसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, उपसचिव (विमान चालन) हेमंत डांगे, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे, मुख्य अभियंता कालिदास भांडेकर उपस्थित होते तर सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली येथील कवलापूर येथे होणाऱ्या विमानतळाच्या जागेसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने व्हिजिबिलिटी सर्व्हे लवकरच करण्यात येईल. सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे याठिकाणी ६६.३६ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. या क्षेत्राव्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करावे लागणार आहे. यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

    सांगली येथील कवलापूर येथे होणाऱ्या विमानतळासाठी लागणारी जमीन विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वे करून घ्यावा असे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

    ००००

    काशीबाई थोरात/विसंअ

     

     

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *