• Fri. Mar 20th, 2026

    पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहरातील महत्त्वाच्या भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 100 वर्ष जुन्या भुयारी मार्गाचे होणार रुंदीकरण

    पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहरातील महत्त्वाच्या भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 100 वर्ष जुन्या भुयारी मार्गाचे होणार रुंदीकरण

    Pune Traffic News: पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एका अरुंद रेल्वे भुयारी मार्ग विस्तारला जाणार असून पुणे महापालिकेने या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन बोगदा बांधून व जुन्या मार्गाचे रुंदीकरण करून सुमारे वीस मीटर रुंदीचा दुहेरी मार्ग उपलब्ध होणार आहे.

    वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 100 वर्ष जुन्या भुयारी मार्गाचे होणार रुंदीकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी हा सध्या शहरातील सगळ्यात जटील प्रश्न बनला आहे. कार्यालय सुरू होण्याची वेळ व सुटण्याची वेळ या वेळांमधील वाहतूक कोंडी ही अभूतपूर्व असते. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या मार्गांवर या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक विभाग हा वेळोवेळी प्रयत्नशील असतो. मिसिंग लिंक जोडण्याच्या प्रकल्पापासून पर्यायी मार्ग शोधत वाहतूक कोंडी कमी करण्याचा पालिकेचा सध्या प्रयत्न आहे.

    यातच आता शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या परिसरांपैकी एक असलेल्या आरटीओ चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकादरम्यानचा अरुंद रेल्वे भुयारी मार्ग अखेर विस्तारण्याच्या दिशेने पावले उचलली गेली आहेत. पुणे महापालिकेने या मार्गाच्या रुंदीकरणासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच सविस्तर आराखडा तयार होणार आहे.

    Maharashtra TimesPune Crime : ताई दुधाची पिशवी द्या; पुण्यात झकपक चोर दुकानात शिरला, मिनिटात मंगळसूत्र खेचलं, हादरवणारं CCTV फूटेज समोर

    पुणे रेल्वे स्थानक, मालधक्का, ससून रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरटीओ कार्यालय या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा हा मार्ग कायम वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातो. शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या भुयारी मार्गाची सध्याची रुंदी फक्त पाच मीटर आहे. या अरुंद मार्गामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, तर रेल्वे स्थानक गाठणाऱ्या प्रवाशांना वेळेत पोहोचणे अवघड होऊन जाते. भुयारी मार्गाची उंची कमी असल्याने मोठ्या वाहनांना विशेषतः मालधक्क्याकडे जाणाऱ्या ट्रकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे ठेवला असून रेल्वे प्रशासनालाही याबाबत पत्र पाठवण्यात आलं आहे.

    रेल्वेकडून जागा मिळाल्यास, सध्याच्या भुयारी मार्गाशेजारी नऊ ते दहा मीटर रुंदीचा नवीन बोगदा बांधण्याचा आणि जुन्या मार्गाचेही रुंदीकरण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यामुळे एकत्रितपणे सुमारे वीस मीटर रुंदीचा दुहेरी मार्ग उपलब्ध होणार असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान, या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. निवड झाल्यानंतर सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाईल. त्यामध्ये भुयारी मार्गाची रचना, अंदाजित खर्च, आवश्यक जागा आणि तांत्रिक बाबींचा समावेश असेल. महापालिकेच्या मते, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आरटीओ परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा