उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा आमदार संग्राम जगताप यांना मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे आता आमदार संग्राम जगताप यांच्यावर खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कारवाई होणार का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहरचे आमदार संग्राम जगताप हे सध्या चर्चेत आहेत. संग्राम जगताप हे कडवी हिंदुत्वाची भूमिका घेताना दिसत आहेत. दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच घ्या, असं संग्राम जगताप म्हणाले होते. तसेच त्यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत अनेक ठिकाणी भाषणं केली. त्यांच्या टोकाच्या भूमिकांमुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच पक्षानेदेखील गंभीर दखल घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार संग्राम जगताप यांना अधिकृतपणे नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. त्या नोटीसवर संग्राम जगताप काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. असं असताना अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा संग्राम जगताप यांना मोठा इशारा दिला आहे.
“आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कुठलाही निर्णय झाला तर त्याला वेगवेगळे मतप्रवाह असतात. प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे”, असं पुण्यातील बैठकीनंतर अजित पवार म्हणाले. पुण्यात आज एक महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी अजित पवार यांना संग्राम जगताप यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसबाबत विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत जगतापांना पुन्हा मोठा इशारा दिला.
अजित पवार काय म्हणाले?
“हे पक्षाच्या विचारधारेला धरुन नाहीय. याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल. तसं सांगितलं होतं, त्यानुसार नोटीस काढलेली आहे. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद, सदस्य असलात आणि त्या पक्षाची विचारधारा सोडून काहीही बोलायला लागलात तर कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही. म्हणून नोटीस दिली आहे. काही प्रक्रिया असते. उत्तर आल्यानंतर काय करायचं याबाबत आम्ही निर्णय घेऊ”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया
दरम्यान, संग्राम जगताप यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संग्राम जगताप यांनी बोलणं टाळलं. “या संपूर्ण प्रकरणाबाबत अजित दादांशी सविस्तर चर्चा करू”, अशी केवळ एका वाक्याची प्रतिक्रिया संग्राम जगताप यांनी दिली आणि ते निघून गेले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा