Kolhapur Youth Commits Suicide Over Love Affair : कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरात आंतरजातीय प्रेमप्रकरणातून एका तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. काल शुक्रवारी प्रीतम कांबळेची प्राणज्योत मालवली. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
प्रेमसंबंधात निर्माण झाला विरोध
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम कांबळे याचं एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, हा संबंध मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हता. त्यांनी या संबंधाला वारंवार विरोध दर्शवून प्रीतमला समज देत मानसिक ताण निर्माण केला होता. या मानसिक त्रासाला कंटाळून प्रीतमने 2 ऑक्टोबर रोजी ग्रामोझोन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच काल शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
Kolhapur Crime : अबब! चहा दुकानात बनावट नोटा छपाई, कोल्हापुरातील पोलीस हवालदारच रॅकेटचा सूत्रधार, एक कोटींच्या खोट्या नोटा जप्त
रुग्णालयाबाहेर गोंधळ, गुन्हा दाखल
प्रीतमच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे नातेवाइक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रुग्णालयात जमले. प्रेमसंबंधाला विरोध करत मानसिक त्रास दिल्यानेच प्रीतमने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. तसेच आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
यानंतर पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रीतमची आई राणी प्रकाश कांबळे (वय 40, रा. हिरवडे खालसा, ता. करवीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णात भिवा पाटील, सविता कृष्णात पाटील आणि धनाजी महादेव पाटील (तिघेही रा. हिरवडे खालसा) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Pune Crime : ‘बैल गेला अन् झोपा केला’, निलेश घायवळ प्रकरणी अडचणीत, पुण्यातील भाजपच्या ‘त्या’ आमदाराने 8 दिवसांनी…
फिर्यादीनुसार तिन्ही संशयितांनी मुलीच्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून वारंवार प्रीतमला मानसिक त्रास दिला होता. या त्रासातूनच त्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री तातडीने कारवाई करत संशयितांना अटक केली. करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे आंतरजातीय प्रेमसंबंध आणि तरुणांच्या मानसिक अवस्थेबाबत प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. सामाजिक स्तरावर अशा प्रकरणात होणाऱ्या दबावामुळे तरुणांच्या जीवावर बेतणाऱ्या घटनांची संख्या वाढताना दिसत असल्याने या प्रकरणाने समाजमन हादरून गेलं आहे.

