Farmers life taken over old dispute: जालना जिल्ह्यातील बोडखा येथे शेतरस्त्याच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्याचा निर्घृण खून झाला. भावकीतील लोकांनी लोखंडी रॉड आणि गजाने मारहाण करून हा गुन्हा केला. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गुरूवारी (9 ऑक्टोबर) घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथे हा प्रकार घडला. शेतरस्त्याच्या जुन्या वादातून झालेल्या भांडणात बाबासाहेब विठ्ठल ढेरे (वय 55) या शेतकऱ्याचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. हा वाद मागील काही वर्षांपासून सुरू होता, मात्र त्या दिवशी तो तीव्र झाला.
Pune News : नेत्याचे बॅनर लावून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा धुमाकूळ; खोट्या आधारकार्डद्वारे बारवर कारवाईही केली; पुण्यातील प्रकाराने खळबळ
‘हा रस्ता तुमचा नाही’
घटनेच्या दिवशी बाबासाहेब ढेरे यांनी आरोपींचा ट्रॅक्टर अडवत, “हा रस्ता तुमचा नाही, तुम्ही इकडून ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकत नाही,” असे सांगितल्यावर वाद पेटला. त्यातून झालेल्या हाणामारीत महादू ढेरे या मुख्य आरोपीने लोखंडी रॉडने बाबासाहेब ढेरे यांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर इतर आरोपींनी, केशव देवीदास ढेरे, देवीदास बापूराव ढेरे, किसन बापूराव ढेरे आणि दिलीप किसन ढेरे, लोखंडी गज आणि काठ्यांनी मारहाण केली. यात बाबासाहेब ढेरे गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.
आरोपी फरार
बाबासाहेब ढेरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहताच सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिक व मृताचे कुटुंबीय घटनास्थळी धावले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि बाबासाहेब ढेरे यांना शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेनंतर मृताची पत्नी शीलाबाई बाबासाहेब ढेरे यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वर नमूद केलेल्या पाचही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
गौतमी पाटीलच्या आरोपांना मरगळे कुटुंबियांचे उत्तर, काय म्हणाले?
घटनास्थळी उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ आणि सहायक निरीक्षक केतन राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली असून पोलीस उपनिरीक्षक रामदास काळे पुढील तपास करत आहेत. सर्व आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.

