पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते Navi Mumbai Internationa Airport च्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन पार पडलं. यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव घेण्यास विसरले नाहीत.
Navi Mumbai International Aiport ला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जावं, अशी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीनुसार अनेक घडामोडी घडल्या आहेत. स्थानिकांनी यासाठी आंदोलन देखील केलं होतं. या सर्व घडामोडींनंतर दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रात पाठवण्यात आला आहे. तिथे प्रस्ताव मान्य झाल्यानंतर विमानतळाला नाव देण्यात येणार आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान आज विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या भाषणात दि. बा. पाटील यांचा उल्लेख केला.
नरेंद्र मोदी दि. बा. पाटील यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?
“आज या मोठ्या क्षणी महाराष्ट्राचे सपुत लोकनेता दि. बा. पाटील यांच्या देखील स्मृतींना उजाळा देतो. त्यांनी समाज, शेतकऱ्यांसाठी ज्या सेवाभावाने काम केलं ते आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहे. त्यांचं जीवन समाज जीवनात काम करणाऱ्यांना नेहमी प्रेरित करतं”, असं नरेंद्र मोदी लोकनेते दि. बा. पाटील यांच्याबद्दल म्हणाले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी भूमिपुत्रांची मनं जिंकली, भाषणात म्हणाले…
नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. “विजयादशमी झाली. कोजागिरी पौर्णिमा सुद्धा झाली. आता दहा दिवसांनी दिवाळी. तुम्हाला या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो”, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. “आज मुंबईची मोठी प्रतिक्षा संपली आहे. मुंबईला आपला दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाला आहे. हे विमानतळ या क्षेत्राला आशियाच्या सर्वात मोठ्या कनेक्टिविटी हबच्या रुपाने स्थापन करण्यासाठी खूप मोठी भूमिका निभावणार आहे”, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.
“आज मुंबईला पूर्णपणे अंडरग्राउंड मेट्रो मिळाली आहे. यामुळे मुंबईत प्रवास करणं आणकी सोपं होईल. लोकांचा वेळ वाचेल. ही अंडग्राऊंड मेट्रो विकसित भारताचं जिवंत प्रतिक आहे. मुंबई सारख्या व्यस्त शहरात जमिनीच्या खाली ही शानदार मेट्रो बनवण्यात आली आहे. मी या प्रकल्पाशी जोडले गेलेल्या प्रत्येकांचं अभिनंदन करतो”, असं मोदी म्हणाले.
“ही वेळ भारताच्या तरुणांसाठी अगणित संधीची वेळ आहे. काही दिवसांपूर्वी देशाच्या अनेक आयटीआयला इंडस्ट्रीजसोबत जोडण्यासाठी 60 हजार कोटींची पीएम सेतू स्किम लाँच झाली आहे. आजपासून महाराष्ट्र सरकारने शेकडो आयटीआय शाळांमध्ये नव्या प्रोग्रॅमची सुरुवात केली आहे. त्यामध्ये ड्रोन, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक गाड्या, सोलार एनर्जी, ग्रीन हायड्रोजन अशा अनेक टेक्नोलॉजींना टायमिंग मिळेल. मी महाराष्ट्राच्या तरुणांना खूप खूप शुभेच्छा देतो”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“आज पूर्ण देश विकसित भारताच्या संकल्पात जोडला गेला आहे. विकसित भारत म्हणजे गती आणि प्रगती असेल. जिथे लोकहित सर्वोपरि असेल. जिथे सरकारची योजना देशवासियांचं आयुष्य सोपं बनवेल”, असंदेखील नरेंद्र मोदी म्हणाले.

