कोल्हापुरात आज रंगतदार असा कार्यक्रम बघायला मिळाला. या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते हजर होते. पण या नेत्यांनी विनोदी शैलीत भाषण करत कार्यक्रमाला रंगत आणली. नेत्यांच्या राजकीय फटकारांमुळे श्रोते देखील खळखळून हसले.
सुरुवातीलाच आमदार सतेज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अशोक सराफ यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या. अशोक सराफ यांना ‘मामा’ हे नाव देखील कोल्हापुरातच मिळाले. त्यांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापुरात त्यांचा सन्मान होतोय याचा कोल्हापूरकर म्हणून सार्थ अभिमान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पुढे मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट आपल्या विनोदी आणि टोलेबाज भाषणाने माहोल रंगवला. “मला आज जास्त बोलायचं होतं, पण बोललो तर उगाच बंटी पाटील यांच्यावर टीका केल्यासारखं होईल. मी भोळाभाबडा माणूस आहे,” असं म्हणत त्यांनी सतेज पाटलांकडे पाहत डोळा मारला. क्षणाचाही विलंब न लावता अगदी खळखळून हसत पाटील म्हणाले, “मग ‘भोळाभाबडा’ नावाचा चित्रपटच काढू आपण तुमच्यावर!” या विनोदी संवादानं सभागृहात मात्र हास्याचा स्फोट झाला.
त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही सूर लावला – “अभिनेते तीन तास मेकअप करतात, पण आम्ही राजकारणी सकाळपासून रात्रीपर्यंत मेकअपमध्येच असतो. काहीजण तर झोपतानाही मेकअप काढत नाहीत,” या वाक्याने हशा आणि टाळ्यांचा कल्लोळ झाला. मनोगत व्यक्त करायला सुरुवात करतानाच मंत्री सामंत म्हणाले, “कोल्हापुरात आलो की कळत नाही, कोण विरोधक आणि कोण सत्ताधारी! सगळंच ठरलेलं असतं” असं म्हणत त्यांनी सतीश पाटील यांच्या निवडणुकीतील ‘आमचं ठरलंय’ या टॅगलाईनवर टोमणा मारला.
यावर सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी खुसखुशीत प्रतिक्रिया देऊन वातावरण हलकंफुलकं ठेवलं. या टोल्यांच्या फेऱ्या ऐकून प्रत्येक प्रेक्षक पोट धरून हसत होता. हास्याची रंगत आणखी वाढली, जेव्हा सामंत म्हणाले, “माझे वडील अशोक सराफ यांचे मोठे चाहते आहेत. त्यांचं कौतुक ऐकून मलाही असं वाटलं, मी पण राजकारणातला कलाकार झालो. आम्ही काय कमी कलाकार नाही!”
शेवटी मंचावर आलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही आपल्या खास विनोदी शैलीत सगळ्यांना उत्तर दिलं. “माझ्यापेक्षा हे सगळेच जास्त विनोदी कलाकार वाटत आहेत. मंत्री सामंत यांचं हे पहिल्यांदाच इतकं मजेशीर भाषण ऐकलं!” असं म्हणत त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि सभागृहात पुन्हा हशांचा वर्षाव झाला.
मंत्री उदय सामंत यांनी देखील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, आमदार सतेज पाटलांनी मला कानात सांगितले होते की, “हा कार्यक्रम हलकफुलका ठेवूयात,” तसेच यापुढेही अशाच पद्धतीचे कार्यक्रम घेतले जावेत, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवल्याचे देखील उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान अशोक सराफ यांच्या पुरस्कार सोहळ्यात नेत्यांनी पक्षीय भेद विसरून हलक्या फुलक्या संवादातून कार्यक्रमाला रंगत आणली. ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ हा केवळ अभिनयाचा गौरव नव्हता, तर हा कार्यक्रम मराठी रंगभूमीच्या भावनेने भरलेला एक आनंदसोहळा ठरला.

