राज्याचे उच्चतंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील प्रकरणावरून रोहित पवारांना सवाल विचारला आहे. कोल्हापुरातील भाजपच्या विजय संकल्प सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रोहित पवारांवर टीका
गौतमी पाटील प्रकरणी रोहित पवार यांच्या टिकेबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला संताप व्यक्त केला. रोहित पवारांवर पलटवार करत ते म्हणाले, “रोहित पवार यांना काय काम धंदा आहे? स्वतःची थोडी तरी पत राखून बोलत जा बाबा. मी काय करायला पाहिजे हे रोहित पवार याने शिकवण्याची गरज नाही. कोणत्या प्रकरणात आम्ही काय भूमिका घेतो, हे ढोल वाजवून सांगायची सवय आम्हाला नाही.” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पूर येथे भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पश्चिम ग्रामीण विभागाची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्ह्यातील सर्व बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच
या सभेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी महत्वाचे विधान केले. त्यांनी सांगितले की, कोर्टातील सर्व याचिका संपल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. दिवाळीनंतर लवकरच आचारसंहिताही लागेल. कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांवर महायुतीचा अध्यक्ष असावा, यासाठी पक्षात एकमत आहे. निवडणुकांच्या तयारीसाठी पक्ष आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत. जिल्हा परिषद झाल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीचीही तयारी लवकरच सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील पक्षप्रवेश
या संकल्प सभेत त्यांनी पुढील निवडणुकींमध्ये भाजपाचा विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, विरोधकांच्या टीकेवर थेट, जोरदार आणि स्पष्ट प्रतिक्रिया देत पक्षाच्या एकत्वासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याचा संदेश दिला. त्यामुळे कोल्हापूरमधील आगामी निवडणुकांवर भाजपाची स्पष्ट पकड असल्याचे दिसून येते. पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली. “२०१४ ते २०१९ दरम्यान आम्ही सन्मान दिला, पण तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस–राष्ट्रवादीकडे गेला,” असे ते म्हणाले. तर पाटील यांनी मंगळवारी सांगली जिल्ह्यात शरद लाड हे भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती देखील दिली आहे.

