• Fri. Mar 6th, 2026
    रोहित पवारांना काय कामधंदा आहे? गौतमी पाटील प्रकरणावरील टीकेवर चंद्रकांत पाटलांचा सवाल

    राज्याचे उच्चतंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील प्रकरणावरून रोहित पवारांना सवाल विचारला आहे. कोल्हापुरातील भाजपच्या विजय संकल्प सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: रोहित पवारांना काय कामधंदा आहे? अशा शब्दांत संताप व्यक्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांच्या टीकेला कडक आणि स्पष्ट प्रत्युत्तर दिलंय. कोल्हापुरातील भाजपाच्या कोल्हापूर ग्रामीण पश्चिम विभागाच्या विजय संकल्प सभेला संबोधित केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते. सध्या चर्चेत असणाऱ्या गौतमी पाटील च्या गाडीचा अपघात प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते. अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसतानाही तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे नेत्याला शोभत नसल्याची टीका रोहित पवारांनी सोशल मीडियावरून केली आहे.

    रोहित पवारांवर टीका
    गौतमी पाटील प्रकरणी रोहित पवार यांच्या टिकेबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला संताप व्यक्त केला. रोहित पवारांवर पलटवार करत ते म्हणाले, “रोहित पवार यांना काय काम धंदा आहे? स्वतःची थोडी तरी पत राखून बोलत जा बाबा. मी काय करायला पाहिजे हे रोहित पवार याने शिकवण्याची गरज नाही. कोणत्या प्रकरणात आम्ही काय भूमिका घेतो, हे ढोल वाजवून सांगायची सवय आम्हाला नाही.” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पूर येथे भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पश्चिम ग्रामीण विभागाची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्ह्यातील सर्व बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच
    या सभेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी महत्वाचे विधान केले. त्यांनी सांगितले की, कोर्टातील सर्व याचिका संपल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. दिवाळीनंतर लवकरच आचारसंहिताही लागेल. कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांवर महायुतीचा अध्यक्ष असावा, यासाठी पक्षात एकमत आहे. निवडणुकांच्या तयारीसाठी पक्ष आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत. जिल्हा परिषद झाल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीचीही तयारी लवकरच सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

    सांगली जिल्ह्यातील पक्षप्रवेश
    या संकल्प सभेत त्यांनी पुढील निवडणुकींमध्ये भाजपाचा विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, विरोधकांच्या टीकेवर थेट, जोरदार आणि स्पष्ट प्रतिक्रिया देत पक्षाच्या एकत्वासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याचा संदेश दिला. त्यामुळे कोल्हापूरमधील आगामी निवडणुकांवर भाजपाची स्पष्ट पकड असल्याचे दिसून येते. पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली. “२०१४ ते २०१९ दरम्यान आम्ही सन्मान दिला, पण तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस–राष्ट्रवादीकडे गेला,” असे ते म्हणाले. तर पाटील यांनी मंगळवारी सांगली जिल्ह्यात शरद लाड हे भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती देखील दिली आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा