• Fri. Mar 13th, 2026
    मुंबई लोकलच्या गर्दीने जवानाचा जीव घेतला, मालाड-गोरेगावमध्ये रुळावर पडल्याने 31 व्या वर्षी मृत्यू

    Mumbai Local Jawan Death : लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे आत शिरता न आल्याने जवान दरवाजावरच उभा होता. मात्र, गर्दीच्या रेट्यामुळे मालाड ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पडून तो गंभीर जखमी झाला होता

    मुंबई लोकल जवानाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गणेश जगदाळे , वय ३१ वर्ष, असं मयत जवानाचं नाव आहे. ते दहिसर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

    स्वस्त आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या पर्यायांवर चर्चा होत असल्या तरी उपाय योजना अद्याप दूरच आहेत. परिणामी लोकलमधून पडून प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत.

    नेमकं काय झालं?

    कर्तव्य बजावून झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान गणेश जगदाळे यांनी नायगाव येथील निवासस्थानी जाण्यासाठी दहिसर स्थानकातून लोकल पकडली होती. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे आत शिरता न आल्याने ते दरवाजावरच उभे होते. मात्र, गर्दीच्या रेट्यामुळे मालाड ते गोरेगाव स्थानकांच्या दरम्यान रुळांवर पडून ते गंभीर जखमी झाले.

    गणवेश आणि ओळखपत्रावरुन गणेश जगदाळे यांची ओळख पटवण्यात आली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. रेल्वे पोलिसांनी त्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
    Maharashtra TimesCrime News : 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात, माजी NSG कमांडो निघाला मोठ्या रॅकेटचा सूत्रधार, दोन महिने पाळत ठेवून अटक
    गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचा अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला असून, बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesPune News : पिंपरीत लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; फायर ब्रिगेडने बाहेर काढलं, पण काळाने गाठलं!
    मुंबई लोकलची गर्दी विभागण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवणे, दरवाजे बंद लोकल चालवणे, कार्यालयीन वेळा बदलणे, स्वस्त आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे अशा अनेक पर्यायांवर चर्चा होत असतात, मात्र प्रत्यक्षात उपाययोजना होताना दिसत नाहीत. यामुळे धावत्या लोकलमधून प्रवासी पडून होणाऱ्या घटना कायम आहेत.

    पुढील दोन वर्षात किमान १० लाख लोकांना घर मिळावीत यासाठी सरकार प्रयत्नशील : प्रताप सरनाईक

    अटल सेतू येथे अपघात

    दुसरीकडे, ससून डॉक बंदर येथे मासे विक्री करून मुरुड येथे परत जात असलेल्या खलाशांच्या पिकअप वाहनाला भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे पिकअप वाहनातील एका खलाशाचा मृत्यू झाला, तर चालक जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी अटल सेतूवर घडली होती. उलवे पोलिसांनी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरु केली आहे. मरण पावलेल्या खलाशाचे नाव सुहास जठारी असे होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा