• Sun. Jun 14th, 2026

    आई दुर्गोत्सवानिमित्त घराबाहेर, घरात दसऱ्याचा आनंदोत्सव, पाठीशी बेरोजगारीची विवंचना; विजयादशमीच्या दिवशी टोकाचं पाऊल

    आई दुर्गोत्सवानिमित्त घराबाहेर, घरात दसऱ्याचा आनंदोत्सव, पाठीशी बेरोजगारीची विवंचना; विजयादशमीच्या दिवशी टोकाचं पाऊल

    Jalgaon man ends life: जळगावात दसऱ्याच्या दिवशी बेरोजगारीने त्रस्त झालेल्या ३३ वर्षीय सुरेंद्र चौधरीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. नोकरी न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

    निलेश पाटील, जळगाव: संपूर्ण देशभरात दसऱ्याचा सण विजयाच्या आणि आनंदाच्या स्वरूपात साजरा होत असताना, जळगावात मात्र एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेल्या एका तरुणाने स्वतःला पेटवून देत आयुष्य संपवले. या घटनेमुळे शहरात आणि परिसरात शोककळा पसरली असून, बेरोजगारीच्या तीव्र समस्येवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    बेरोजगारीमुळे मानसिक तणाव

    मृत तरुणाचे नाव सुरेंद्र रामसिंग चौधरी (वय ३३, रा. गाधाकृष्ण नगर, जळगाव) असे असून, तो आपल्या आईसोबत राहत होता. काही महिन्यांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या सुरेंद्रवर बेरोजगारीचे ओझे आणि मानसिक तणाव वाढत होता. सततच्या प्रयत्नांनंतरही नोकरी न मिळाल्याने तो खोल नैराश्यात गेला होता.
    Maharashtra Timesदीड वर्षांपूर्वी जिची ‘हत्या’ तीच महिला बॉयफ्रेंडसोबत सापडली, गावातून पहिल्यासोबत पळाली, दुसऱ्यासोबत MP ला पोहोचली

    विजयादशमीच्या दिवशी टोकाचं पाऊल

    गुरुवारी (२ ऑक्टोबर) दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी, त्याची आई दुर्गोत्सवाला गेल्याने तो घरी एकटाच होता. याच संधीचा फायदा घेत त्याने घरात उपलब्ध ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतला आणि स्वतःला पेटवून घेतले. काही क्षणातच तो ज्वालांनी वेढला गेला आणि आरडाओरड करत घराबाहेर रस्त्यावर धावत सुटला.

    उपचारादरम्यान अखेरचा श्वास

    हे पाहून परिसरातील तरुणांनी तत्काळ धाव घेतली, पाणी टाकून आग विझवली आणि सुरेंद्रला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले, परंतु ९० टक्क्यांहून अधिक भाजल्यामुळे त्याला वाचवणे अशक्य झाले. अखेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला.

    बारामतीकर तुलना करणार; लोकसभेनंतर शरद पवारांचा आदरार्थी उल्लेख, अजितदादांच्या मनात काय?

    या घटनेची नोंद जळगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, याला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आला आहे. सुरेंद्रच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी बेरोजगारीसारख्या गंभीर प्रश्नावर सरकारने गांभीर्याने पावले उचलण्याची मागणी केली आहे. विजयादशमीच्या दिवशी विजयाचा सण आनंदाने साजरा व्हावा, असा समाजाचा सर्वसाधारण विश्वास आहे. परंतु, याच दिवशी एका तरुणाने नैराश्यातून घेतलेले हे टोकाचे पाऊल संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेले आहे.

    निलेश पाटील

    लेखकाबद्दलनिलेश पाटीलमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये जळगाव ‘जिल्हा प्रतिनिधी’ म्हणून कार्यरत. गेल्या 12 वर्षापापूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात. तरुण भारत, सकाळ, लाईव्ह ट्रेण्ड न्यूजमधून प्रवास करीत मटा ऑनलाइनपर्यंत प्रवास.… आणखी वाचा