• Fri. Mar 6th, 2026
    Abu Azmi : मराठी-हिंदीमध्ये फरक काय, भिवंडीत मराठीची काय गरज? अबू आझमींच्या वक्तव्याने संताप

    Abu Azmi on Marathi Language : भिवंडीत रस्ते रुंदीकरण पाहणीसाठी आलेल्या आमदार अबू आझमी यांना मराठी माध्यमांनी मराठीत प्रतिक्रिया विचारली असता मराठी – हिंदीमध्ये फरक काय असं म्हणत मराठीत उत्तर देण्यास नकार दिला. मनसेनेही मनसे स्टाईल उत्तर देऊ असा इशारा दिला.

    Abu Azmi | ही भिवंडी आहे म्हणत मराठीत बोलण्यास नकार; अबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद

    प्रदीप भणगे, भिवंडी : भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू कासीम आझमी हे आज भिवंडीत आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हिंदी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मात्र यावेळी मराठीत प्रतिक्रिया देण्याबाबत मराठी माध्यमांनी विचारणा केली असता अबू आझमी यांनी मराठीत उत्तर देण्यास टाळाटाळ करत हिंदीमध्ये तिखट उत्तर दिलं.

    ‘मराठी – हिंदीमध्ये फरक काय? मराठीची आवश्यकता काय आहे?’

    मराठीत प्रतिक्रिया विचारली असतानाही त्यांनी उत्तर देत सांगितलं, की मराठी – हिंदीमध्ये फरक काय आहे, मी मराठी बोलू शकतो पण मराठीची आवश्यकता काय आहे, ही प्रतिक्रिया फक्त भिवंडी पुरतंच मर्यादित आहे. दिल्लीमध्ये आणि यूपीमध्ये जर हा मराठी बाईट, जर हे मराठी विधान जाईल तर ते कोणाला समजणार आहे? असा सवाल करत अबू आझमी यांनी मराठीत प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. त्यांच्या या विधानाने संताप व्यक्त केला जात आहे.

    अबू आझमींच्या विधानावरुन मनसे आक्रमक

    मराठीच्या मुद्द्यावरून मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. परेश चौधरी यांनी अबू आझमी यांच्या बेताल वक्तव्याला चोख प्रत्युत्तर दिलं.
    याबाबत बोलताना ते म्हणाले, अबू अझमी तुम्ही राजकारण महाराष्ट्रामध्ये करत आहेत. महाराष्ट्रात राजकारण करताना तुम्हाला उत्तर प्रदेशातील भैयांची परवा पडली आहे का? भिवंडी हे महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच चालेल, मराठीची जर लाज वाटत असेल, तर तुम्हाला मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असं म्हणत त्यांनी अबू आझमींच्या वक्तव्याचा निषेध, विरोध करत संताप व्यक्त केला आहे.

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा