• Thu. Mar 19th, 2026
    ‘इथे सुसू करू नको रे!’ म्हणणं पडलं महागात; क्षणातच केला चाकूने वार आणि…

    Nashik murdered by minor: नाशिकमध्ये किरकोळ कारणावरून एका फिरस्त्याचा चाकूने वार करून खून करण्यात आला. लघुशंकेच्या वादातून एका विधिसंघर्षिताने बंडू गांगुर्डे यांची हत्या केली.

    नाशिक: क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका फिरस्त्याचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नेहमी झोपण्याच्या जागेवर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातूनच बंडू लक्ष्मण गांगुर्डे (वय ३५, मूळ रा. बाऱ्हे, सुरगाणा) या फिरस्त्याचा एका विधिसंघर्षिताने छातीत वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे, या विधिसंघर्षिताने पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा खून केला असून त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील वडाळा नाका उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रात्री ही घटना घडली. गंभीर जखमी बंडू गांगुर्डेचा रविवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अक्का बंडू गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर मुंबई नाका पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesSolapur Crime : रेडिमेड कापड व्यावसायिकाने कारखान्यातच आयुष्य संपवलं, लग्नाच्या तोंडावर टोकाचं पाऊल, आई आणि जुळ्या भावाचा टाहो
    मोलमजुरी करणारे गांगुर्डे दाम्पत्य काही दिवसांपासून वडाळा नाका भागातील उड्डाणपुलाखाली वास्तव्यास होते. शुक्रवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास हे दाम्पत्य जेवणाची तयारी करत असताना काही अंतरावर विधिसंघर्षित लघुशंका करत होता. त्यावेळी बंडूने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र या किरकोळ वादातून संशयिताने अचानक चाकू काढून बंडूवर वार केला. अक्का गांगुर्डे यांनी आरडाओरडा केल्याने संशयित तिथून पळून गेला. गंभीर जखमी बंडूला सुरुवातीला तात्पुरते उपचार देण्यात आले आणि शनिवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी सायंकाळी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

    नाशकात पूरस्थिती, गिरीश महाजनांचा रात्री उशीरा पाहाणी दौरा

    महिन्याभरात केला दुसरा खून

    दरम्यान, या घटनेत सामील असलेला विधिसंघर्षित मुलगा काही दिवसांपूर्वीच सुधारगृहातून पळून गेला होता. २ सप्टेंबर रोजी त्याने सीबीएस येथील पदपथावर ५० वर्षीय फिरस्त्याचा दगडाने ठेचून खून केला होता. मृत फिरस्त्याने त्याच्या प्रेयसीला छेडल्याच्या कारणावरून त्याने हा खून केला होता. इतकंच नव्हे तर खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाजवळ तो नाचलाही होता. त्या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला होता. त्या हत्येनंतर न्यायालयाने त्याला मनमाडच्या बाल सुधारगृहात रवानगी केली होती; मात्र आठवडाभरातच त्याने पलायन करून नाशिक गाठले आणि पुन्हा एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला.