• Thu. Mar 19th, 2026
    ओवैसींच्या सभेआधीच अहिल्यानगरचं राजकारण तापलं, संग्राम जगतापांचा एमआयएमवर बोचरा वार

    Sangram Jagtap on Asaduddin Owaisi : अहिल्यानगरमध्ये ओवैसींच्या सभेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी ओवेसींवर जोरदार टीका केली. एमआयएमची पतंग कधी कापायची हे महाराष्ट्राला माहीत आहे, असे ते म्हणाले. वक्फ बोर्डाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, फाळणीनंतर भारतात आलेल्या सर्व समाजांसाठी स्वतंत्र कायद्याची मागणी जगताप यांनी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेचा मुद्दा गाजत आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मात्र ओवैसींवर जोरदार टीका केली आहे.

    जगताप ओवैसींवर निशाणा साधत म्हणाले की, एमआयएमची पतंग किती उंच न्यायची आणि कुठे कापायची हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला ठाऊक आहे. पतंग फक्त हिंदूंच्या संक्रांतीलाच उडते, इतर वेळी ती कुणालाच मान्य नसते. त्यामुळे पतंगीच्या जीवावर जर कोणी मांजा-चक्री खेळत असेल, तर त्याचा बंदोबस्त हिंदू समाज करू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

    वक्फ बोर्डाद्वारे विशिष्ट समाजालाच न्याय

    वक्फ बोर्डाच्या कामकाजावरही जगतापांनी सवाल उपस्थित केले. वक्फ बोर्डाद्वारे केवळ एका विशिष्ट समाजालाच न्याय दिला जातो. फाळणीच्या वेळी भारतात बाहेरून आलेल्या इतर समाजांवर अन्याय होता कामा नये. त्याकाळी फक्त एका वर्गासाठी कायदा तयार करण्यात आला. आमची मागणी आहे की, फाळणीनंतर भारतात आलेल्या सर्व समाजांसाठी स्वतंत्र कायदा करावा. लवकरच याबाबत आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत, असे जगताप म्हणाले.

    ओवेसींची सभा, नगरच्या महापालिकेच्या रणधुमाळीचा रंग आणि त्यावरून पेटलेला राजकीय वाद यामुळे नगरचे राजकारण तापले आहे.

    दरम्यान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कोल्हापूर दौराही वादात अडकला. यावर भाष्य करताना इम्तियाज जलील म्हणाले, ‘राज्य सरकार, विरोधक तसेच समाजात तणाव निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर कडाडून हल्ला केला. पूरग्रस्त भागात फक्त दिखाऊ दौरे करून राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांना त्वरित व थेट मदत देणे गरजेचे आहे.’

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा