• Sun. Mar 8th, 2026
    नदीत सूर मारला, पण पाण्याचा अंदाज चुकला, ऐन नवरात्रीत चौघं बुडाली, कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

    Buldhan Minor Boys Drown : पाच अल्पवयीन मुलं केशवा मंदिराजवळील बंधाऱ्यासमोर नळगंगा नदीतील डोहात पोहायला गेली असताना ही दुर्घटना घडली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बुलढाणा : मलकापूर आणि नांदुरा तालुक्यातील दोन घटनांमध्ये चौघं जण बुडाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. यातील एकाचा मृतदेह सापडला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथे नळगंगा व्याघ्र नदीच्या संगमावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह एकूण चौघे जण बुडाले.

    मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील शुभम दवंगे (१६) आणि सोहम सोनोने (१५) ही दोन मुलं शिवणी रस्त्यावरील निंबोळी गावानजीक व्याघ्रा नदीपात्रात बुडाली. यातील शुभमचा मृतदेह सापडला असून सोहमचा शोध सुरू आहे. हे दोघेही पोहण्यासाठी गेल्याचं सांगण्यात येत आहे.

    पाच अल्पवयीन मुलं केशवा मंदिराजवळील बंधाऱ्यासमोर नळगंगा नदीतील डोहात पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. दोघं बुडाल्याचं पाहून काठावर असेलली तिघं गावात मदत मागायला गेली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

    दुसरीकडे, नादुरा तालुक्यातील निमगाव येथील करण भोंबळे (१८) व वैभव फुके (२२) हे दोघे ज्ञानगंगा नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. त्यांचा शोध घेतला जात आहे.

    या घटनेमुळे निमगाव आणि परिसरात शोकळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जयवंत सातव, निमगावचे सरपंच विकास इंगळे, पोलीस पाटील, तलाठी, ओम साई फाउंडेशनचे सदस्य तसेच मानेगाव येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं

    दोघांनी वाचवले तिघांचे प्राण

    नवरात्रीनिमित्त श्री जगदंबा देवीच्या दर्शनाला आलेल्या निंबा येथील तिघा बापलेकांना नदीत बुडण्यापासून दोघा युवकांनी वाचवलं. या थरारक प्रसंगानंतर भाविकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
    Maharashtra TimesPune Crime : नऊ महिन्यांच्या बाळाची आई… वैष्णवी हगवणे प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय, सासू-नणंदेबाबत म्हणाले…
    मंदिरालगत वाहणाऱ्या वान नदीला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. देवीचं दर्शन करून परत जात असताना दोन मुलं नदीत पोहण्यासाठी उतरली. खोल पाण्यामुळे ते बुडू लागले. मुलांना वाचवण्यासाठी वडिलांनीही पाण्यात उडी मारली, मात्र तिघंही बुडण्याच्या स्थितीत असताना तिथे उपस्थित असलेले जीवन इंगळे आणि विठ्ठल कुरवाळे या दोघांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली.
    Maharashtra TimesRatnagiri Crime : भक्ती मयेकरला कॉल करुन छळणाऱ्या सीताराम वीरबाबत मोठी अपडेट, पोलीस तपासात रिक्षावाल्याने काय सांगितलं?
    दोघांनी दाखवलेल्या धाडसामुळे तिघांना सुरक्षित काठावर आणण्यात यश आलं. या घटनेबद्दल गावकरी आणि भाविकांकडून जीवन इंगळे, विठ्ठल कुरवाळे यांचं कौतुक केलं जात आहे. त्यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. नवरात्र उत्सवात वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी नदीलगत विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा