Thane MNS against Tanker Mafia : ठाण्यात नवरात्रोत्सवात पाणीप्रश्न तसंच घोडबंदर रोडवरील टँकर माफियांचा मुद्दाही तापला आहे. मनसेने टँकर माफियांविरोधात आवाज उठवला असून याप्रश्नी पालिका आयुक्तांसोबत बैठक होणार आहे.
ठाण्यात सणासुदीच्या काळात घरात पाणी नसल्याने रहिवासी त्रस्त झाले असून या मुद्द्याला आता पालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय बळ मिळाले आहे. कळवा, मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करुनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्याने बुधवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली. तसेच भाजपने याप्रश्नी मोर्चा काढला.
कात्रप-खरवई रिंग रोडमुळे प्रवाशांना मोठा फायदा; बदलापूरवरुन थेट पनवेल, मुंबई – बडोदा हायवे जोडणार, कसा आहे मार्ग?
या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पालिकेला अल्टिमेटम दिलेले असताना मनसेने घोडबंदर रोड येथील गृहसंकुलात टँकर माफियांच्या मुजोरीविरुद्ध आवाज उठवला आहे. या भागातील गृहसंकुलांमधील रहिवाशांनी टँकर माफियांच्या समस्येबाबत मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पत्र दिले आहे. यामध्ये टँकरच्या भरमसाट बिलांचा प्रश्न, पालिकेकडून दिले जाणारे कमी दाबाने पाणी आणि रहिवाशांच्या समस्यांचा पाढाच वाचण्यात आला आहे. याबाबत ठाणे पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बुधवार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता बैठक बोलावली असून या बैठकीत पाणीप्रश्नी त्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे मनसेचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
लाखोंच्या बिलांपायी गणित बिघडले
घोडबंदर रोड येथील कासारवडवलीच्या एका गृहसंकुलाला पाच महिन्याचे दोन टँकर कंपन्यांचे बिल १२ लाख ७६ हजार रुपये आले आहे. या गृहसंकुलात ३३३ सदनिका असून १२०० रहिवासी वास्तव्य करतात. याठिकाणी नेहमीच पाणी कमी दाबाने येते. त्यामुळे रहिवाशांना टँकरवर अवलंबून रहावे लागत असल्याचे स्थानिक रहिवासी श्रद्धा महाडिक यांनी नमूद केले.
मुंब्रा-कळव्यातील पाणी समस्येवर जितेंद्र आव्हाड आक्रमक,दसऱ्यापर्यंतची मुदत, अधिकार्यांना धरले धारेवर!
वाढत्या लोकवस्तीचा परिणाम
या भागात लोकवस्ती वेगाने वाढत असून सर्वच ठिकाणी पाणी पुरवण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. तरीही योग्य पद्धतीने पाणी पुरवठा करण्याकडे पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
पालिका प्रशासनातील अधिकारी आणि टँकर माफियांचे साटेलोटे आहे. एकीकडे टँकर माफियांचा काळाबाजार तेजीत असून पालिका प्रशासन येथील गृहसंकुलांना पाणी पुरवण्यात अपयशी ठरत आहेत. मनसे याबाबत प्रशासनाला येत्या बुधवारी जाब विचारणार आहे, अशी माहिती ठाणे, मनसे जिल्हाध्यक्ष, अविनाश जाधव यांनी दिली आहे.

