• Tue. Mar 10th, 2026

    Rain News: मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस, मराठवाड्यातही धो-धो बरसणार, पुढील 48 तास धोक्याचे, IMD चा नवा अलर्ट

    Rain News: मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस, मराठवाड्यातही धो-धो बरसणार, पुढील 48 तास धोक्याचे, IMD चा नवा अलर्ट

    Maharashtra Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मात्र, अजून दोन दिवस हा पाऊस असाच बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: महाराष्ट्रातील पाऊस ओसरण्याची सध्या कोणतीही आशा नाही. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पाऊस कोसळत आहे. यामुळे मराठवाड्यात पूर आला आहे, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. पण, हा पाऊस आणखी काही दिवस असाच सुरु राहणार असल्याची माहिती आहे.

    हवामान खात्याने आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे 26 सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे मान्सून परतताना पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या हवामानात लक्षणीय बदल झाला आहेत. आयएमडीनुसार, कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    दक्षिण ओडिशाच्या आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर चक्राकार वातावरण कायम आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकताना हे कमी दाबाचे क्षेत्र आज गंभीर अशा कमी दाबाच्या क्षेत्रात विकसित होण्याची अपेक्षा आहे. या बदलांमुळे वाऱ्याची दिशा बदलली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार वारे वाहू लागले आहेत.

    25 ते 30 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहील. 27 ते 28 सप्टेंबरला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज कोकण किनारपट्टी, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा जिल्हे पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने या सर्व भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

    हवामान खात्याने पुढील दोन दिवस म्हणजे 27 आणि 28 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा