Congress Harshvardhan Sapkal: नरेंद्र मोदी यांनी वयाची 75 ओलांडली आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत. यावरुन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने काँग्रेसचे सपकाळ यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. वार्तालापात सपकाळ यांनी राजकीय भाष्य़ करताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने बोलण्याऐवजी भाजपचे नेते का पुढे येतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार भाजपची डोकेदुखी वाढवणार? बालेकिल्ला वाचवण्यासाठी धडपड, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिलन’
गेल्या काही वर्षांमध्ये लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस ला मिळालेल्या अपयशामुळे काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला का, याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता ‘काँग्रेस पूर्वीपासूनच ‘मास बेस’ पक्ष होता. त्यामुळेच जे आले ते सत्तेच्या गादीवर बसले. मात्र, आता आम्ही काँग्रेसला ‘केडर बेस’ पक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याशिवाय ‘भारत जोडो’च्या धर्तीवर आता ‘पक्ष जोडो’ मोहीम हातात घेणार आहोत,’ असे सूतोवाचही त्यांनी केले.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपला वैचारिक पातळीवर कायमच विरोध करणारा काँग्रेस हा एकमेव देशव्यापी राजकीय पक्ष असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत; तसेच दोन ऑक्टोबरला गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन असून, याच दिवशी संघाचा वर्धापनदिन आहे. हा संकेत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने समजून घ्यावा. १०० व्या वर्धापनदिनाच्या दिवशी मनुस्मृतीचे दहन करून राज्यघटना आपल्याकडे ठेवावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली. दोन ऑक्टोबरला युवक काँग्रेसचे पदाधिकारी नागपूर येथे रेशीमबागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त भारताच्या राज्यघटनेची प्रत भेट देणार असल्याचेही सपकाळ यांनी जाहीर केले.

