• Tue. Jun 9th, 2026
    दिवाळीनंतर राजकीय फटाके, आचारसंहितेचा कालावधी लांबणार, महापालिका निवडणूक कधी? तीन टप्प्यांचा प्रस्ताव समोर

    Maharashtra Election Commission : महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बरीच वर्षे रखडल्या असून, 31 जानेवारी 2026 च्या आत या निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे

    मुंबई महापालिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    संजय व्हनमाने, मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. त्यानुसार, मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात म्हणजे जानेवारी २०२६ मध्ये घेतल्या जाणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. दिवाळीनंतर लगेचच पहिल्या टप्प्यात, नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय फटाके फुटणार आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहितेचा कालावधी लांबण्याची शक्यता असून, त्याचा फटका विकासकामांना बसणार असल्याचे बोलले जात आहे.

    न्यायालयाचा आदेश

    महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बरीच वर्षे रखडल्या असून, आता पुढील वर्षी ३१ जानेवारीच्या आत या निवडणूका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची लेखी प्रत अद्याप आयोगाला प्राप्त झालेली नाही. तथापि, न्यायालयाचे निर्देश लक्षात घेऊन आयोगाकडून तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे.

    आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. शेवटच्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयाप्रत निवडणूक आयोग आला आहे. याबाबतचा अधिकृत प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला देण्यात येणार असून, यात प्रस्तावित निवडणूक कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती आयोगाकडून राज्य सरकारला दिली जाईल.

    आयोगाकडून तयारी

    मुंबई आणि इतर २९ महापालिका निवडणुकांच्या तयारीला काहीसा अवकाश आहे. मात्र, जिल्हा परिषदा; तसेच नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी जवळपास होत आली आहे. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यांत या निवडणूक पार पडणार आहेत. तर, येत्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई महापलिका तसेच इतर महापालिकांच्या प्रभाग रचेनेचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते.

    आचारसंहिता क्षेत्रापुरतीच

    तीन टप्प्यांतील निवडणुकांमुळे राज्यात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे. अर्थात ही निवडणूक आचारसंहिता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रापुरती लागू असणार आहे. शिवाय राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशनही छोट्या कालावधीचे करण्यात येणार असल्याचे समजते.

    ‘राज्यात सन २०२२ पासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्याव्यात,’ असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ‘यापुढे या निवडणुकांसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. सर्व प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात,’ असे न्यायालयाने बजावले होते.

    न्यायालयाने या वेळी राज्य निवडणूक आयोगाला फटकारले होते. याशिवाय सरकारच्या कार्यशैलीवरही नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने मे महिन्यात एक अंतरिम आदेश दिला होता. यामध्ये चार महिन्यांत म्हणजे सप्टेंबरच्या आत निवडणुका घेण्याचा निर्देश देण्यात आले होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा