• Sun. Jun 14th, 2026

    …अन्यथा एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही; सुप्रिया सुळेंचा नाशिकमधून सरकारला इशारा

    …अन्यथा एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही; सुप्रिया सुळेंचा नाशिकमधून सरकारला इशारा

    NCP Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चात सरकारला धारेवर धरत सरसकट कर्जमाफीसाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. कर्जमाफी न केल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

    सुप्रिया सुळेंचा नाशिकमधून सरकारला इशारा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, नाशिक: “आज आपण शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकत्र आलो आहोत. राज्यातील तमाम शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टर कार्यालयात जाऊन कर्जमाफीची मागणी करा. एका महिन्याच्या आत सरसकट कर्जमाफी दिली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एकही मंत्र्याला फिरू देणार नाही,” असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला आहे.

    नाशिक शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शेतकरी कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सुळे पुढे म्हणाल्या, “ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद केले, ते मिळवून देण्यासाठी संघर्ष करू. यूपीए सरकारच्या काळात 70 हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. नाशिक जिल्हा बँकेतून 65 हजार शेतकऱ्यांची नावे कमी करून इतरांची नावे घेतली गेली. या प्रकरणाची चौकशी लावण्यासाठी आम्ही सर्व खासदार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू.
    हा मोर्चा ही छोटीशी सुरुवात आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. केंद्रात कृषिमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना भेटून शेतकरी प्रश्न मांडू,” असं आश्वासन सुळे यांनी दिलं आहे.

    Maharashtra TimesBanjara Community Protest : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज रस्त्यावर उतरला, ST कोटासाठी लढा उभारला; पण मुंडेंच्या त्या वक्तव्याने संताप

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून सकाळी साडेदहाला मोर्चा निघाला. या मोर्चात ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारांसह पक्षाचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी झाले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कांद्याची मुक्त निर्यात सुरू करावी, कापसाची आयात तातडीने थांबवावी, द्राक्ष उत्पादकांना विशेष पॅकेज तसेच शेतीमालाला हमीभाव द्यावा, दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान मिळावे यासह विविध मुद्यांवर हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा