Chhatrapati Sambhajinagar Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. ज्यामुळे केळगाव आणि आसपासच्या गावांना मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आणि माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागांत ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. याचा सर्वाधिक फटका पैठण तालुक्यासह सिल्लोड तालुक्याला बसला आहे. या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, जनावरे वाहून गेली त्यासह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेले हजारो हेक्टर वरील पिकासह माती वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक देखील वाहून गेला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठ संकट ओढावलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात केळगाव येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसात केळगाव येथील कृष्णा दाभाडे, धोंडीबा दाभाडे, मंजीत दाभाडे या शेतकऱ्यांची गट क्रमांक 461 येथे शेती आहे. दाभाडे यांनी मका कापूस इत्यादी पीक लागवड केली आहे. संकटांना सामोरे जात या पिकांचं संगोपन केलं आहे. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे दाभाडे यांच्या शेतातील पिकासह माती वाहून गेली आहे. तर दुसऱ्या घटनेत सिल्लोड तालुक्यातील धावडा येथील गणेश बनकर यांचं नदीकाठावर ३० गुंठे शेत आहे. या शेतात गणेश बनकर यांनी फुलकोबी चवळी याची लागवड केली आहे. मात्र ढगफुटी सदृश्य पावसामध्ये फुलकोबी चवळीसह शेतातील मातीच वाहून गेली आहे. जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकार या मागणीकडे किती गांभीर्याने पाहतं? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

