• Thu. Jun 11th, 2026
    Vasai Ro-Ro Service : मुंबईकरांसाठी नव्या मार्गाची तयारी, वसईतून रो-रो सेवा लवकरच, ठाणे-नवी मुंबईत जाण्यासाठी कसा होणार फायदा?

    Vasai and uUttan Ddongri Ro-Ro Service : मुंबईकरांसाठी आणखी एक प्रवासी मार्गाची सुविधा तयार होत आहे. वसईच्या खाडीवरील नागला बंदर आणि उत्तन डोंगरी येथे रो-रो सेवा सुरू करण्यासाठी जेट्टी उभारण्यात येणार आहे. या जेट्टीसाठी मंजुरी मिळाली आहे. याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : वसईच्या खाडीवरील नागला बंदर व पश्चिम किनाऱ्यावरील उत्तन डोंगरी येथे भविष्यात रो-रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सागरी मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत या दोन्ही ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. त्याला सीआरझेडसंबंधी मंजुरी प्राप्त झाली आहे.

    राज्याच्या किनारपट्ट्या प्रवाशांसाठी समुद्रीमार्गे जोडण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. या धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्र सागरी मंडळ करत आहे. त्या अंतर्गत किनारपट्ट्यांवर जेट्टी उभारण्यात येणार आहेत. त्यातच उत्तन डोंगरी व नागला बंदर येथे रो-रो सेवेच्या दृष्टीने जेट्टी उभारण्यास किनारपट्टी नियमन क्षेत्रासंबंधी महत्त्वाची मंजुरी मिळाली आहे.
    Maharashtra TimesMumbai AC local Train : लोकलचे मालडब्बेही AC होणार, स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणेचं नियोजन; कशी असणार सुविधा?
    या अंतर्गत नागला बंदर व उत्तन या दोन्ही ठिकाणी १४३ मीटर लांब व १० मीटर रुंदीच्या जेट्टी उभारल्या जाणार आहेत. या जेट्टी सर्वाधिक लांबीच्या असून रो-रोसारखे मोठे जहाज तेथे उभे राहू शकेल. त्याच वेळी या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून जलप्रवासाच्या दृष्टीने मोठे केंद्र उभारले जाणार आहे. यासाठीच जेट्टींशिवाय वाहनतळ, बोटीत चढण्यासाठीचा मार्ग, संरक्षक भिंत यांचेही बांधकाम होणार आहे. त्यामध्ये नागला बंदर येथे २,०२५ चौरस मीटर, तर उत्तन डोंगरी येथे ७,२०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा वाहनतळ, नागला बंदर येथे ४५.४२ मीटर उंचीची, तर उत्तन डोंगरी येथे ६० मीटर उंचीची संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.
    Maharashtra Timesपनवेल-बोरिवली-वसईमार्गे लोकलची नवी मार्गिका; विरारपर्यंत खास लाइन, नव्या कॉरिडोरचा कसा होणार फायदा?
    या सर्व बांधकामाला महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र नियमन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) सीआरझेडसोबत कांदळवनांसंबंधीच्या उपाययोजना करण्यासह मंजुरी दिली आहे. तसेच अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या संबंधित प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

    ठाणे, नवी मुंबईतही नियोजन; नवी मुंबई-ठाणेकरांना कसा होणार फायदा

    – महाराष्ट्र सागरी मंडळाने ठाणे व नवी मुंबई परिसरातही चार जेट्टी बांधण्याचे नियोजन केले आहे.
    – त्यामध्ये वाशी, ऐरोली, मुलुंड मिठागर परिसर व ठाण्याच्या चेंदणी कोळीवाड्याजवळील मीठबंदर यांचा समावेश आहे.
    – त्याठिकाणी वन विभागाची परवानगी नसल्याने तो प्रस्ताव एमसीझेडएमएने अद्याप मंजूर केलेला नाही.
    – हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, नवी मुंबई, वसई ते मुंबईची उत्तर-पश्चिम किनारपट्टीही एकमेकांशी जलमार्गे प्रवासी वाहतुकीने जोडली जाऊ शकेल.
    मंत्रालयाच्या संबंधित प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा