Sharad Pawar NCP News: सरकारने ओबीसी विरुद्ध मराठा लढाई हुशारीने लावल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. तसंच सत्तेतील आमदाराने छगन भुजबळ यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा निषेधही नोंदवला.
भाजपवर हल्लाबोल करताना जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, “देशात लोकशाहीचा पराभव होतो आहे. राज्यघटना विसर्जित होते आहे. मूठभर लोकांच्या हाती सत्ता ठेवणे हा या सरकारचा उद्देश. जे घर घर तिरंगा म्हणतात त्यांच्या मनात एकेकाळी तिरंग्याबाबत घरघर होती. 1942 च्या आंदोलनात इंग्रजांचे खबरे कोण होते हे इतिहासाच्या पाना पानावर आहे. आज गुगलवर सर्वात जास्त शोध नेहरूंचा घेतला जातो आहे. महाराष्ट्रात जातीय, धार्मिक द्वेष पसरवला जातो आहे. जामनेरला आई वडिलांसमोर मुलाला मारले हा आपला महाराष्ट्र आहे का,” असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक मध्ये उपस्थित केला.
आरक्षणाबाबत मोठी बातमी: सरकारविरोधात दोन मोर्चे काढणार, काँग्रेस नेत्याकडून तारखेची घोषणा, भुजबळांनाही जाहीर ऑफर
“शेठजी आणि भटजी यांनीच आयुष्यभर ज्यांचा पक्ष चालवला त्यांच्या मनात ओबीसीबद्दल काय असणार? तुमचा डीएनए ओबीसीचा नाही. आरएसएस यूपी, गुजरात मध्ये नाही तर महाराष्ट्रात जन्माला आली. गांधी हत्या करणारा महाराष्ट्रात जन्माला आला. व्हीजेएनटीला एसटीचे अधिकार द्या, असे हैद्राबाद गेझेटियमध्ये म्हटलं आहे. ओबीसी समाजाला अस्वस्थ करण्याचे कामं सरकारने हुशारीने केले आहे. ओबीसींनी डोळे उघडावेत. भुजबळ यांचा अपमान होतोय, पण मंत्रिमंडळातले कुणीही त्यावर चकर शब्द बोलत नाही हे विशेष. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबाबत आमचं दुमत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळायला हवे. लोकसभेत तुमचे बहुमत. मग वाढवा ना 15 – 20 टक्के आरक्षण. मराठा आरक्षणाचा कायदा आणून दाखवा कास्तकार ताकदीने उभे राहतील. हिम्मत असेल तर आरक्षण देऊन दाखवा,” असं आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी भाजपला दिलं आहे.
‘पुढचा मोर्चा तरुणांसाठी’
“भाजपला पुन्हा एकदा जात व्यवस्था बदलायची आहे पण हे आम्ही होऊ देणार नाही. बिहारला जनगणना झाली. 63 टक्के ओबीसी आहेत. मी निधर्मी आहे. मला जात नाही. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर यांचा आहे. महाराष्ट्र पेटवण्याचं कामं केलं जात आहे. महागाई, भ्रष्टाचारात बरबटलेला महाराष्ट्र हातातून जातोय, हे लक्षात येत असल्याने डिव्हाइड अँड रुल हे धोरण राबवलं जात आहे. ही व्यवस्था बरबाद करायला निघालेली टोळी आहे. मुंबईत एका रस्त्याच्या उभारणीत तीन हजार कोटींचा घोटाळा झाला असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. ते टेंडर रद्द करावे लागले पण ऍडव्हान्स कोणाच्या खिशात गेला? शक्तीपीठ म्हणजे निव्वळ लक्ष्मीदर्शन आहे. भ्रष्टाचार फक्त आर्थिक नाही तर नैतिक देखील आहे. या देशाचे वाटोळं मनुवादने केले. आजही दिल्लीत बसले आहेत. तेच ओबीसी मराठा यांच्यात भांडण लावत आहेत. इतिहास जड जाणार आहे. आम्ही महाराष्ट्राचं वाटोळं होऊ देणार नाही. पुढचा मोर्चा तरुणांसाठी असेल,” अशी घोषणा यावेळी आव्हाड यांनी केली.

