• Sun. Jun 14th, 2026
    ‘करो या मरो…’ मराठा जीआरविरोधात ओबीसी आक्रमक, 10 ऑक्टोबरला नागपुरात महामोर्चा; वडेट्टीवारांचा सरकारवर वार

    OBC Leaders Decides to Make Protest : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात ओबीसींची बैठक झाली, ज्यात १० ऑक्टोबरला नागपूरमध्ये भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू कऱण्यात आले आहे. शासनाने यासंदर्भात जीआर काढल्याने ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असून यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असल्याचे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे. नागपुरात आमदार तथा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजातील प्रतिनिधींची बैठक पार पडली आहे. मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींनी आता आक्रमक भूमिका घेत मोठा लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.

    नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, राज्य शासनाने काढलेला हा जीआर मागासवर्गीयांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. कोणीही कितीही म्हणलं की, जीआरमुळे ओबीसींना धक्का बसणार नाही, परंतु प्रत्यक्षात मोठे नुकसान झाले आहे. या जीआरच्या निषेधार्थ ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

    बैठकीत ठरविण्यात आले की, १० ऑक्टोबरला नागपूरमध्ये ओबीसींचा भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथून निघणार असून संविधान चौकात त्याचा समारोप होणार आहे. उमेश कोर्राम हे या मोर्चाचे समन्वयक असणार आहेत. वडेट्टीवार यांनी सांगितले की, हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असून, एक लाखांहून अधिक ओबीसी बांधव यात सहभागी होतील.

    मोर्चासाठी कोणताही नेता, आयोजक किंवा प्रायोजक नसून, हा संपूर्णपणे ओबीसी समाजाचा मोर्चा राहणार असल्याचे वडेट्टीवारांनी नमूद केले आहे. ‘आम्ही पक्ष म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून या लढाईत आहोत. ओबीसी समाजाच्या या आंदोलनात पक्षीय भूमिका बाजूला ठेवून मोर्चात सामील व्हावे,’ असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

    बैठकीत विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पुढील काळात २० सप्टेंबर रोजी मराठवाड्यात बैठक घेण्यात येणार असून, तिथेही मोर्चाच्या तारखा निश्चित होतील. तसेच मुंबईतही मोठ्या मोर्चा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.

    या मोर्चाचे घोषवाक्य असेल, ‘आपल्या हक्कांसाठी ओबीसींनी आता लढावे किंवा मरावे.’ वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री यांनी तातडीने चर्चा करून जीआर मागे घ्यावा. ‘जो कोणी या जीआरचे समर्थन करतो, तो ओबीसींच्या लढाईशी प्रामाणिक नाही,’ असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा