Latur News : लातूरमध्ये एका तरुणाने ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झाल्याने ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याची भीती त्याला होती. तरुणाने नदीत उडी मारून जीवन संपवले. त्याने सुसाईड नोटमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत आपली निराशा व्यक्त केली होती.
भरत महादेव कराड (रा. बांगदरी, ता. रेणापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती ऑटो चालवून किंवा इतर वाहनांवर चालक म्हणून काम करणारा तरूण असला तरी तो गेली काही वर्षापासून ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात प्रत्येक आंदोलनात हिरीरीने सहभागी झालेला तरुण आहे.
छगन भुजबळ कोर्टात गेले तर कसं लढणार? मनोज जरांगे यांनी प्लॅन सांगितला
त्याने चिठ्ठीत आपले म्हणणे मांडले. तो म्हणाला, सरकारने मराठ्यांना हैद्राबाद गॅझेट लागू करून ओबीसींचे आरक्षण कायमस्वरूपी संपविले आहे. मी वेळोवेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या माझ्या कुटुंबातील आणि माझ्या समाजातील लोकांना न्याय मिळेल अशा अपेक्षेने आत्महत्या केल्याचे लिहिले आहे.
काल सायंकाळी बांगदी शिवारात मांजरा नदीपात्रात घोषणा देत ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहिजे, सरकार ओबीसी विरोधी आहे. माझ्या कुटुंबियांना व ओबीसी समाजाला न्याय मिळावा, अशा घोषणा देत नदीपावात उडी मारून आत्महत्या केली. यावेळी काही तरूण त्या नदीपात्राच्या आसपास होते. भरत कराड याने पात्रामध्ये उडी मारताच तरूणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही, प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले व आज दुपारी बांगदरी येथे भरत कराड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारावेळी घोषणाबाजी
ओबीसी आरक्षण संदर्भात आंदोलन करणारा भरत कराड यांच्या अंत्यविधीच्या वेळी गाव व परिसरातील शोकाकूल नागरिकांनी ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, भरत कराड यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशाही घोषणा दिल्या. भरत कराड याच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्याकडे अवधी १० ते २० गुंठे जमीन असल्याचे सांगण्यात येते. सरकार मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून कुणबी म्हणून ओबीसींच्या सवलती व जात प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आरक्षण कायमस्वरूपी संपणार आहे. याबाचत उपस्थितांमध्ये सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

