Dhananjay Munde : बीडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी सामाजिक समतेवर भर दिला आहे. त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे यांसारख्या महापुरुषांचे कार्य केवळ एका जातीसाठी नव्हते, तर ते सर्व समाजाच्या हितासाठी होते. त्यामुळे मुंडेंनी उपस्थितांना समतेची कास धरण्याचे आवाहन केले.
सत्यशोधक समाज भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थितांना संबोधन करताना धनजंय मुंडे म्हणाले की, समाजात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या लोकांचा आपण पुरस्कार वितरण सोहळा ठेवला. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात प्रत्येकाला अनुभव आला असेल. आज आपण प्रत्येकाने आपआपलेच महामानव बांधून घेतलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला फक्त मराठा समाजाने साजरी करायची का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरा करायचा का? महात्मा फुले यांची जयंती फक्त माळी समाजाने साजरी करायची का? शिक्षणाची चळवळ महात्मा फुले यांनी सुरू केली म्हणून फक्त माळी समाजातील लोकांनी शिक्षण घ्यायचे का? भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने साजरी करायची का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
OBC Leaders on Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींचा एल्गार! जीआर वरुन वातावरण तापलं, दोन आघाड्यांवर लढण्याचा निर्धार
मुंडेंनी पुढे महामानवांचे कार्य अधोरेखित करत उपस्थितांना समतेची कास धरण्याचे आवाहन केले आहे. ‘मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो इथे उपस्थित आणि व्यासपीठावरील सर्वांना एक प्रश्न विचारतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य फक्त मराठा समाजासाठी उभे केले नव्हते तर ते अठरा पगड समजासाठी उभे केले होते. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिले हे संविधान फक्त मागास प्रवर्गातील लोकांसाठी निर्माण नाही केले. साहित्यातून उपाशी माणसांची व्यथा खऱ्या अर्थाने कुणी मांडली, लिहिली तो माणूस म्हणजे अण्णा भाऊ साठे. महात्मा फुले यांनी देश स्वातंत्र्य होण्याअगोदर शिक्षणाची चळवळ निर्माण केली ती फत माळी समाजासाठी नाही केली. भगवान बाबांनी अध्यात्मतून आणि शिक्षणातून सांगड घातली ती फक्त वंजारी समाजासाठी नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह सर्वच महापुरुषांचे कार्य आणि शिकवण ही सर्वसमावेशक राहिलेले आहे,’ असे त्यांनी अधोरेखित केले.
मुंडेनी असेही आवाहन केले की, महामानवांच्या कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करताना आपण महापुरुषांना जातीय बंधनात अडकवत न ठेवता सर्वव्यापी कार्य करायला हवे. पुढे ते म्हणाले, माझी तुम्हा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरलेली नाही. मला सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा? असा सवाल देखील यावेळी धनजंय मुंडे यांनी उपस्थित केला. तर ‘बीडमध्ये ही प्रथाच पडली आहे, अशी खंतही मुंडेंनी व्यक्त केली.
यासाठी सर्वांनीच आणि सर्व समाजातील लोकांनी पुन्हा पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे. आपण ज्या मागण्या याठिकाणी केल्यात इथून पुढची सर्व जबाबदारी माझी आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

