Thane News : ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव डम्परच्या चाकाखाली आल्याने दाम्पत्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने लोबो कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लोबो दाम्पत्य साकीनाका ९० फूट रोड येथील महात्मा फुले नगरमध्ये राहत होते. लोबो दाम्पत्य गुरुवारी दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुपारी मोटारसायकलवरून मुंब्रा येथे कामानिमित्त गेले होते. त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते मुंब्रा येथून नवी मुंबई मार्गे साकीनाका येथील घरी जात होते. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटारसायकल शीव-पनवेल मार्गावरील वाशी टोल नाक्यावजवळ आली असताना, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डम्परची त्यांना धडक बसली.
ठाणे जिल्ह्यात महाभयंकर पाऊस, हवामान विभागाकडून रेड अलर्ट, पुढचे 3 तास अतिमहत्त्वाचे
त्यामुळे लोबो दाम्पत्य डम्परच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोबो दाम्पत्याचे मृतदेह रुग्णालयात पाठवून दिले. डम्परचालकाने त्याच्या निष्काळजीपणे डम्पर चालवत नेल्यामुळे हा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार डम्परचालक रेवतलाल महातो (३४) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.
दरम्यान, अलीकडच्या काळात डम्परच्या अपघातांचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. वेगाने वाहन चालवणे, नियमांकडे दुर्लक्ष आणि बेपर्वाईमुळे गंभीर दुर्घटना घडत आहेत. जीवितहानीसह वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. अशा अपघातांवर नियंत्रणासाठी कडक नियमांची अंमलबजावणी आणि चालकांना जबाबदारीची जाणीव होणे आवश्यक आहे.

