• Mon. Mar 16th, 2026

    मुंबईत 34 Human Bomb घुसलेत, 400 किलो RDX ने एक कोटी लोकांना उडवणार, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

    मुंबईत 34 Human Bomb घुसलेत, 400 किलो RDX ने एक कोटी लोकांना उडवणार, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

    Mumbai Police Bomb Threat : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. “आम्ही धमकी गांभीर्याने घेतली असून तपास सुरू केला आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईत 34 आत्मघाती हल्लेखोर अर्थात ह्युमन बॉम्ब पेरल्याचा फोन शुक्रवारी आल्याने मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर ही धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 34 गाड्यांमध्ये तब्बल 400 किलो आरडीएक्स ठेवले असून संपूर्ण शहर हादरवून टाकण्याची सनसनाटी धमकी फोनवर देण्यात आली.

    मुंबई पोलिसांना वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन शहरात मोठा स्फोट घडवण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्याने 34 गाड्यांमध्ये आरडीएक्स ठेवल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्याने स्वतःला लष्कर-ए-जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले. धमकी अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला देण्यात आल्यामुळे मुंबईसह राज्यभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

    पोलिसांनी सांगितले की, धमकीच्या संदेशात 34 गाड्यांमध्ये मनुष्य बॉम्ब वापरले जातील आणि 400 किलो आरडीएक्सचा स्फोट घडवून एक कोटी लोकांना मारले जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

    मुंबई पोलिसांनी धमकी गांभीर्याने घेतली असून शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे.

    दरम्यान, पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

    याआधी, सोमवारी, ठाणे जिल्ह्यातील कळवा रेल्वे स्टेशन उडवून देण्याची खोटी धमकी देणाऱ्या 43 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश मधुकर रणपिसे याने रविवारी दुपारी चार वाजकाच्या सुमारास पोलीस हेल्पलाईन नंबरवर फोन करत कळवा रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा