Bombay High Court on Maratha Protest : केवळ पाच हजार जणांना आंदोलनाची परवानगी असताना काय काळजी घेतली? असा सवाल हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारला.
केवळ पाच हजार जणांना परवानगी असताना काय काळजी घेतली? असा सवाल Mumbai High Court ने आंदोलकांच्या वकिलांना विचारला. आंदोलकांकडे परवानगी नाही, त्यामुळे दोन वाजून 40 मिनिटांपर्यंत तात्काळ जागा रिकामी करा, आम्हाला तीन वाजेपर्यंत सर्वकाही सुरळीत झालेलं हवं, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन आढावा घेऊ, असं कोर्टाने निक्षून सांगितलं.
आंदोलकांच्या वकिलांनी काय सांगितलं?
यापूर्वी पाचशे मोर्चे काढले, पण कधीही अशी परिस्थिती उद्भवली नाही, यापुढे कोणतेही आंदोलक बेशिस्तपणे वागणार नाहीत, याची हमी देऊ, असे मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. स्वाती साठे यांच्या खंडपीठासमोर म्हणणे मांडले. खंडपीठाने दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी ठेवली.
Manoj Jarange On High Court : आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न, कोर्टाच्या निर्णयावर जरांगे संतापले!
दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाच्या सूचनांची माहिती दिली. मात्र मनोज जरांगेंनी सूचना दिल्याशिवाय इथून इंचभरही न हलण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. परंतु शिस्तीत, कुठल्याही प्रकारे गालबोट न लावता आंदोलन सुरु ठेवण्यावर आंदोलकांचा भर आहे.
याआधी, मुंबई पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस सकाळीच बजावली होती. मात्र त्यानंतरही मनोज जरांगे किंवा मराठा आंदोलकांनी कुठलीही हालचाल केली नाही. आता कोर्टाने फटकारताच आंदोलक काय करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

