• Mon. Mar 9th, 2026
    मोठी अपडेट: मराठ्यांच्या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळणार? सरकारचा मसुदा तयार, कोणता फॉर्म्युला शोधला?

    Manoj Jarange Patil Maratha Protest : मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून एक प्रस्ताव तयार केला जात असून कुणबी प्रमाणपत्रांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

    मोठी अपडेट: मराठ्यांच्या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू असून सरकारकडून जरांगे यांना देण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. याबाबतचा मसुदा जवळपास निश्चित झाले असून गावातील नातेवाईक आणि कुणबी प्रमाणपत्रधारकांनी दिलेल्या प्रतिज्ञाच्या आधारावर इतरांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा विचार सरकारकडून सुरू असल्याचे माहिती आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कुणबी नोंदींच्या पडताळणीसाठी ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावर नवी पडताळणी समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. नव्याने स्थापित होणारी पडताळणी समिती गावपातळीवरील नोंदी शोधणार आहे. त्यामुळे मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये केवळ लोकसंख्या नमूद असल्याने ते जसंच्या तसं लागू करता येणार नाही.

    Maharashtra TimesMaratha Andolan : तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, नाहीतर… हायकोर्टाचा मराठा आंदोलकांना अल्टिमेटम, मनोज जरांगेंनाही जबर दंडाचा इशारा

    काय आहे सरकारचा विचार?

    भटक्या व विमुक्त जातींतील लोकांना जातींची प्रमाणपत्रे देताना बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामसेवकांच्या पातळीवर गृहचौकशी करून, त्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबत 2008 मध्ये शासन आदेश (जीआर) काढण्यात आला होता. त्याच धर्तीवर मराठा समाजाला कुणबीचा दाखला देताना गृहचौकशी करून मग प्रमाणपत्र देता येईल का, यावर सरकार पातळीवर गंभीर चर्चा सुरू आहे. त्यानुसार कच्चा मसुदा तयार करून आठवडा अखेरपर्यंत त्यास अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

    मागासवर्गीय जातींना प्रमाणपत्रे देण्याबाबत 2001 मध्ये एक जीआर काढण्यात आला होता. मात्र, त्यात भटक्या विमुक्त जातींना प्रमाणपत्रे देताना अडचणी येत होत्या. हा समाज भटकंती करणारा असल्याने प्रमाणपत्रे देताना या अडचणी येत होत्या. त्यावर तोडगा काढताना 2008 मध्ये पुन्हा एक नवा जीआर काढण्यात आला. नव्या जीआरनुसार भटक्या व विमुक्त जातींच्या नागरिकांची ग्रामसेवकाच्या पातळीवर गृहचौकशी करण्याचे ठरले. या चौकशीनंतर त्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबतचा निर्णय नव्या जीआरमध्ये अंतर्भूत केला होता.

    दरम्यान, मराठा समाजालाही ओबीसींचे प्रमाणपत्र देताना नोंदी आढळून येत नसल्याच्या अडचणी आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता 2008 च्या जीआरच्या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देता येतील का, याची चाचपणी सुरू केली आहे. गृहचौकशी करताना संबंधित नागरिक कष्टकरी, शेतकरी, मोलमजुरी करणारे आहेत का, याची गृहचौकशी करण्यात येईल. त्याचा अहवाल सक्षम अधिकाऱ्यांना दिला जाईल.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा