Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मनोज जरांगे हे मागील पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. उच्च न्यायालयाने आंदोलकांना रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून आज मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान रिकामे करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली. या नोटिशीला जरांगे यांच्याकडून कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहावं लागेल. कारण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा पवित्रा जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या सुरुवातीलाच घेतला होता.
Chhagan Bhujbal: …तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; छगन भुजबळांचा सरकारला इशारा
दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्राथमिक चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम होते. मात्र त्यानंतर सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्री आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीतील चर्चेनंतर सरकारकडून आज जरांगे पाटील यांना एक प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, “इतर मागासवर्ग प्रवर्गातच (ओबीसी) मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण आंदोलन शांततेनं आणि अटी व नियमांचं पालन करून होत नसल्याचं स्पष्ट आहे’, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवलं असून मुंबईतील शांतता बिघडू नये आणि जनजीवन सुरळीत व्हावे यादृष्टीने मनोज जरांगे पाटील, वीरेंद्र पवार व अन्य प्रतिवादींनी आंदोलकांनी व्यापलेले सर्व रस्ते व संबंधित जागा आज, मंगळवारी दुपारी 12 पर्यंत रिक्त होतील आणि त्या जागा स्वच्छ होतील, याची खबरदारी घ्यावी, असा आदेश न्या. रवींद्र घुगे व न्या. गौतम आंखड यांच्या खंडपीठाने दिला. तसंच आज, मंगळवारी दुपारी 1 वाजता नियमित न्यायालयात पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे.

