Nashik Harihar Fort Youth Dies : नाशिक जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तरुण नाशिकमध्ये फिरायला आले होते. यावेळी तो हरिहर गडावर गेला असता त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत जाऊन कोसळला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
आशिष आणि त्याचे सुमारे २० साथीदार एका मिनी ट्रॅव्हल्सने महाराष्ट्र दर्शनासाठी निघाले होते. काल शनिवारी ते नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तहसीलमधील हरिहर किल्ल्यावर पोहोचले. किल्ला फिरून झाल्यावर ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सर्व साथीदार डोंगरावरून खाली उतरत होते. यादरम्यान पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. ज्यामुळे आशिषचा तोल गेला आणि तो थेट खोल दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू झालं, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि खूप प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला. अपघाताची बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मोठा ट्विस्ट, सरसकट नका करु, मनोज जरांगे यांनी सरकारला नवा पर्याय सुचवला
खमारी बुटी गावात शोकाचे सावट
गावातील सुमारे २० तरुणांनी महाराष्ट्र दर्शनाचं नियोजन केलं होतं. परंतु या प्रवासादरम्यान आशिषच्या निधनामुळे आनंदाच्या वातावरणाचं शोकात रूपांतर झालं. आशिष अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील टिकाराम समारीत, आई, तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. अचानक झालेल्या अपघातानं संपूर्ण कुटुंबाला खूप धक्का बसला आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर नाशिकमध्ये मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर मृतदेह गावी पाठवण्यात आला.
Crime News : ‘तुम्ही ड्रेनेज दुरुस्त करुन द्या’; दुरुस्तीला आले अन् धक्कादायक चित्र समोर, छत्रपती संभाजीनगर हादरलं
आज रविवारी सकाळी आशिषचा मृतदेह खमारी येथे पोहोचला. जेथे गावकऱ्यांच्या उपस्थितीत आशिषचे अंतिमसंस्कार करण्यात आले. आशिष हा त्याच्या मित्रांमध्ये एक मेहनती, शांत आणि लोकप्रिय तरुण होता. शेतकरी कुटुंबात वाढलेला आशिष आपल्या कष्टाने आयुष्यात पुढे जाण्याचं स्वप्न पाहत होता. पण नियतीने अल्पावधीतच त्याचं आयुष्य हिरावून घेतलं. त्याच्या मृत्यूबद्दल लोकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. आशिषच्या तरुण वयात झालेल्या निधनानं त्याचे मित्रही हैराण झाले आहेत.

