धाराशिवातील घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका तरुणानं मित्राला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली मात्र नको तेच घडलं. ज्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
रामवाडी येथील रोहीत सुखदेव साबळे वय( १७) हा तेरणा नदीत पोहोण्यासाठी शनिवार दि.३० रोजी दुपारी तीनच्या सुमारास गेला होता परंतु पाय घसरून नदीत बुडाला म्हणून त्याला वाचवण्यासाठी अशोक रामभाऊ इंगळे वय(२५)यांने नदीत उडी मारली. त्यानंतर गावातीलच लहू वाघमोडे यांनी ही मदतीसाठी नदीत उडी मारली व रोहीत यास पाण्याच्या प्रवाहातून बाजूला काढले.परंतू नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने अशोक इंगळे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला .अशोक यास वाचविण्यासाठी इतर गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. तर लहू वाघमोडे व रोहीत साबळे हे बाहेर सुखरूप नदीच्या काठावर आले.
अशोक इंगळे वाहून गेल्याची माहिती मिळताच तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांनी रामवाडीत धाव घेऊन नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या.च्या माध्यमातून शोध मोहीम राबवली परंतु अंधार पडल्याने ही मोहीम थांबविण्यात आली होती. रविवारी सकाळी ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली त्यावेळी सकाळी अशोक इंगळे यांचा मृतदेह सापडला. त्याचा मित्र रोहित साबळे हा प्रचंड प्रमाणात घाबरलेला असल्याने त्यास तेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करून धाराशिव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान तहसीलदार डॉ मृणाल जाधव ,ढोकीचे स. पो. नि. विलास हजारे,बीट अंमलदार प्रदीप मुरळीकर, प्रकाश तरटे, रामवाडीच्या तलाठी विद्या माने,तेरचे तलाठी प्रशांत देशमुख, खेडचे तलाठी शरद इप्पर, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी ग्रामस्थ, नातेवाईक घटनास्थळी होते . या घटनेनं धाराशिवात हळहळ व्यक्त केली जात आहे.

