मनोज जरांगे यांच्या आंदोलना दरम्यान आणखी एका मराठा आंदोलकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेवरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.
“देवेंद्र फडणवीस यांनी दोन बळी घेतले. माझ्या आता लक्षात आलं. आणखी किती खून करायचे? आज आमच्या एका बांधवाला सीएसएमटीवर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांनी आज रुग्णवाहिका ठेवली असती तर त्याचा जीव वाचला असता. आमच्या रुग्णवाहिका वाशीला अडवल्या. तिथेच थांबवून ठेवल्या. त्या येऊ दिल्या असत्या तर आज त्या बांधवाचा मृत्यू झाला नसता. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या एका मुलाचा खून केला”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“आज सीएसएमटी समोर खून केला आहे. त्याला खूनच म्हणतात. आरक्षण दिलं असतं तर खून झाला नसता. त्याला खूनच म्हणतात. कालही शिवनेरीजवळ आमच्या एका बांधवाला हृदय विकाराचा झटका आहे. तो सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला खून होता. आता सुट्टी नाही. आणखी संधी गेली नाही. किती खून करायचा आहे? असा प्रश्न दोन-तीन दिवसात मराठे विचारायला सुरुवात करणार आहेत”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगेंचा आणखी एक आरोप
“आझाद मैदानात उपोषणाला परवानगी देणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे ते स्पष्ट झालेलं आहे. हे काय न्यायदेवतेच्या हातात नाहीय. त्यांना मुद्दाम मराठ्यांना परवानगी द्यायची नाही. त्यांनी आणखी एक दुसरा खेळ केला आहे. त्यांनी आमच्या येणाऱ्या गाड्यांना केवळ मैदान दाखवलं. पण त्या मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग सांगायचा नाही आणि आमच्या मुलांच्या गाड्या रोखून धरायच्या, वरुन त्यांनीच म्हणायचं की, मराठ्यांमुळे गर्दी झाली, रोड जाम झाला. रोड कुणी जाम केला? देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी केला”, असा देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“तुम्ही ग्राउंड द्या. लोकं तिथे गाड्या लावून पायी येतील. त्यांनी लोकांबद्दल गैरसमज पसरवला. तसेच परवानगी देणं हे देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहे. एक-दोन दिवसांच्या परवानगीची गरज नाही. अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत परवानगी द्यावी. मी इथून उठणार नाही. गोळ्या घातल्या तरी उठणार नाही. पुढच्या शनिवारी आणि रविवारी आख्खा महाराष्ट्र इथे येणार आहे. माझं त्यांना सांगणं आहे, एकाही पुराला डिवचू नका. तुम्ही चुकीचं पाऊल उचलू नका”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केलं.
“मला आताच एक माहिती मिळाली, एक मराठा बांधव आला होता. मला तो बांधव माहिती नाही. तो माझ्या ओळखीचा नाही. पण तो आंदोलनासाठी आला होता. लालबागच्या गणपतीचं मंडळ गोरगरिबांसाठी जेवायचं काम करत होतं. त्यांनी तिथे सांगितलं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तुमच्या इथे दर्शनाला आणतोय. मराठा आंदोलकांना जेवण देणं बंद करा. ही काय नियत असते? मला माहिती नाही हे अमित शाह यांना माहिती आहे का? पण तशी बातमी आहे. हे महागात पडणार आहे”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

