• Sat. Mar 14th, 2026
    ‘देवेंद्र फडणवीस यांनी खून केला’, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

    मनोज जरांगे यांच्या आंदोलना दरम्यान आणखी एका मराठा आंदोलकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेवरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान मुंबईत एक दुखद घटना घडली. मराठा आंदोलक विजय घोगरे यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. दोन दिवसांमधील मराठा आंदोलनातील ही दुसरी घटना घडली आहे. या घटनेवरुन मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या दोन मराठा आंदोलकांचा खून केल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ‘एबीपी माझा’ वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपांवर आता सरकारकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    “देवेंद्र फडणवीस यांनी दोन बळी घेतले. माझ्या आता लक्षात आलं. आणखी किती खून करायचे? आज आमच्या एका बांधवाला सीएसएमटीवर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांनी आज रुग्णवाहिका ठेवली असती तर त्याचा जीव वाचला असता. आमच्या रुग्णवाहिका वाशीला अडवल्या. तिथेच थांबवून ठेवल्या. त्या येऊ दिल्या असत्या तर आज त्या बांधवाचा मृत्यू झाला नसता. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या एका मुलाचा खून केला”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

    “आज सीएसएमटी समोर खून केला आहे. त्याला खूनच म्हणतात. आरक्षण दिलं असतं तर खून झाला नसता. त्याला खूनच म्हणतात. कालही शिवनेरीजवळ आमच्या एका बांधवाला हृदय विकाराचा झटका आहे. तो सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला खून होता. आता सुट्टी नाही. आणखी संधी गेली नाही. किती खून करायचा आहे? असा प्रश्न दोन-तीन दिवसात मराठे विचारायला सुरुवात करणार आहेत”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

    मनोज जरांगेंचा आणखी एक आरोप

    “आझाद मैदानात उपोषणाला परवानगी देणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे ते स्पष्ट झालेलं आहे. हे काय न्यायदेवतेच्या हातात नाहीय. त्यांना मुद्दाम मराठ्यांना परवानगी द्यायची नाही. त्यांनी आणखी एक दुसरा खेळ केला आहे. त्यांनी आमच्या येणाऱ्या गाड्यांना केवळ मैदान दाखवलं. पण त्या मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग सांगायचा नाही आणि आमच्या मुलांच्या गाड्या रोखून धरायच्या, वरुन त्यांनीच म्हणायचं की, मराठ्यांमुळे गर्दी झाली, रोड जाम झाला. रोड कुणी जाम केला? देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी केला”, असा देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

    “तुम्ही ग्राउंड द्या. लोकं तिथे गाड्या लावून पायी येतील. त्यांनी लोकांबद्दल गैरसमज पसरवला. तसेच परवानगी देणं हे देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहे. एक-दोन दिवसांच्या परवानगीची गरज नाही. अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत परवानगी द्यावी. मी इथून उठणार नाही. गोळ्या घातल्या तरी उठणार नाही. पुढच्या शनिवारी आणि रविवारी आख्खा महाराष्ट्र इथे येणार आहे. माझं त्यांना सांगणं आहे, एकाही पुराला डिवचू नका. तुम्ही चुकीचं पाऊल उचलू नका”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केलं.

    “मला आताच एक माहिती मिळाली, एक मराठा बांधव आला होता. मला तो बांधव माहिती नाही. तो माझ्या ओळखीचा नाही. पण तो आंदोलनासाठी आला होता. लालबागच्या गणपतीचं मंडळ गोरगरिबांसाठी जेवायचं काम करत होतं. त्यांनी तिथे सांगितलं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तुमच्या इथे दर्शनाला आणतोय. मराठा आंदोलकांना जेवण देणं बंद करा. ही काय नियत असते? मला माहिती नाही हे अमित शाह यांना माहिती आहे का? पण तशी बातमी आहे. हे महागात पडणार आहे”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा