• Fri. Jun 5th, 2026
    प्रेमात जरासा वाद, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं LICमध्ये काम करणाऱ्या गर्लफ्रेंडला संपवलं, घाटात मृतदेह फेकला; महाराष्ट्रात खळबळ

    Ratnagiri Girlfriend Murder Body Thrown into Ambaghat : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक धक्कादायक घटना रत्नागिरीमध्ये उघडकीस आली आहे. एलआयसी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रेयसीची तिच्या प्रियकराने हत्या करुन मृतदेह आंबाघाटात फेकला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    रत्नागिरी गर्लफ्रेंडची हत्या मृतदेह आंबाघाटात फेकला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात सध्या हत्येचे प्रकार वाढले असून पोटच्या मुलानेच आईची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता एक दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यात साखरपाजवळ असलेल्या आंबाघाटात बेपत्ता प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेपत्ता असलेल्या या तरुणीची हत्या झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेली तरुणी ही रत्नागिरीतील एलआयसी ऑफिसमध्ये गेल्या वर्षभर तात्पुरत्या स्वरूपात काम करत होती. तर संशयित आरोपी दुर्वास दर्शन पाटील हा रत्नागिरी परिसरातील एका बिअर बारवाल्याचा मुलगा आहे, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे येथील भक्ती जितेंद्र मयेकर (वय २६) ही तरुणी काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा कुटुंबीयांकडून तिचा सर्वत्र शोध सुरू होता. याचदरम्यान भक्तीच्या घरच्यांनी संशयित आरोपी दुर्वास दर्शन पाटील (वय २५) याच्याबद्दल आधीच संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच हत्या केल्याची कबुली दिली आहे. या सगळ्या प्रकारची गंभीर दखल पोलीस प्रशासनानं घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा परिषद बाबुराव महामुनी व शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील तात्काळ आंबाघाटात या तरुणीच्या मृतदेहाच्या शोधासाठी पोलीस पथक घेऊन सायंकाळी उशिरा दाखल झाले. यावेळी आंबा घाटात तिचा मृतदेह आढळून आला. आंबाघाटात तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह फेकल्याची घटना समोर आल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
    Maharashtra Times‘मुंबईत गेल्यावर मी..’ अजित पवारांनी दिला दिलासा, ५८ कोटी रुपयांबाबत स्पष्टच बोलले दादा…
    भक्तीचा परिचय वाटद-खंडाळा येथील दुर्वास पाटील याच्यासोबत होता. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यात वाद निर्माण झाले. त्यातूनच दुर्वास पाटील याने रागाच्या भरात भक्तीची हत्या केली असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. भक्ती बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसांनी दुर्वास याच्याकडे चौकशी सुरू केली होती. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देत आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या कसून तपासानंतर अखेर त्याने सत्य कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी आज शनिवारी सायंकाळी उशिरा भक्तीचा मृतदेह आंबाघाटातील दरीतून बाहेर काढला.

    लेकीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    या प्रकरणी आरोपी दुर्वास पाटील याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रत्नागिरी परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अतिरिक्त जिल्हा परिषद बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

    Maharashtra Timesरत्नागिरी रेल्वे स्थानकावरील अंगाचा थरकाप उडवणारी दृश्य, अतिघाई नडली, धक्कादायक व्हिडीओ समोर

    बिअर बारवाल्याच्या मुलाने केली हत्या

    बेपत्ता तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 365/2025 क. 138 BNS अन्वये दाखल केला. आरोपी दुर्वास दर्शन पाटील यास चौकशीकरिता ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी करून तांत्रिक पुराव्याच्या मदतीने तपास केला असता आरोपीने 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.45 वाजताच्या सुमारास त्याच्या सायली देशी बारमध्ये हा प्लॅन केला. त्याचे दोन साथीदाराच्या मदतीने कट रचून हत्या केल्याची व तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह आंबा घाट परिसरात फेकून दिल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे आंबा घाटातल्या दरीतून पोलिसांनी ट्रेकर्स यांच्या मदतीने भक्तीचा मृतदेह बाहेर काढला आहे. त्यावरून सदर गुन्ह्यात आरोपी दुर्वास पाटील व त्याचे दोन साथीदार यांच्यासोबत हत्येचा कट रचून मृतदेह आंबाघाट परिसरात आणून फेकलेला असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं सदर गुन्ह्यात आरोपींना अटक केली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा