• Sat. Jun 13th, 2026

    आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतच! मनोज जरांगेंचा निर्धार, आंदोलनास पोलिसांकडून आणखी एक दिवसासाठी परवानगी

    आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतच! मनोज जरांगेंचा निर्धार, आंदोलनास पोलिसांकडून आणखी एक दिवसासाठी परवानगी

    Manoj Jarange Patil: आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मराठा आंदोलकांचे जथ्थे शुक्रवारी सकाळीच मुंबईच्या आझाद मैदान धडकले. रेल्वेसह रस्तेमार्गांनी दाखल झालेल्या मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीने मुंबापुरी दणाणली.

    jarange news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : आझाद मैदानावर आलेले मराठा आंदोलक वैतागून निघून जावेत, यासाठी सरकारने पाण्याची व्यवस्था बंद केली, स्वच्छतागृहे बंद करण्यात आली, चहा आणि नाश्त्याची दुकाने, उपाहारगृहे बंद ठेवली गेली. हे सरकार इंग्रजांपेक्षाही ‘बेक्कार’ आहे’, अशा शब्दांत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडताना मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे-पाटील यांनी ‘मी एकतर इथेच जीव देईन किंवा आरक्षण घेऊन जाईन’, असा ठाम निर्धार शुक्रवारी केला.

    आंदोलकांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सह आसपासचा परिसर व्यापला. जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळी १०च्या सुमारास आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली. मराठा आंदोलकांना पोलिसांनी आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी दिली होती. सायंकाळी मुंबई पोलिसांनी आणखी एक दिवसाची परवागनी दिली. त्यानंतर जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘पुढील एक-दोन दिवस मी पाणी पित आहे. पण, सरकारने ताणले तर तेही बंद करून कडक उपोषण करेन. तुरुंगात टाकले तर तिथेही मरेपर्यंत उपोषण करेन, गोळ्या झाडल्या तर झेलून मृत्यूमुखी पडेन. पण, तडजोड करणार नाही’, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

    रस्त्यावर जेवण, जागा मिळेल तिथे झोपले…मुंबईत मराठा बांधवांचे प्रचंड हाल

    ‘हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने अस्सल डाव खेळावा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे. तुम्ही एक-एक दिवस परवानगी दिली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण होणार आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. आज सिद्ध झाले की, मैदानात आंदोलन करायला देणे किंवा न देणे हे सरकारच्या हातात आहे’ असे जरांगे म्हणाले. ‘सरकारने शौचालये कुलूप लावून बंद केली, पाण्याची परिस्थिती तीच आहे. चहाचे, नाश्ता आणि जेवणाची दुकानेही बंद करण्यात आल्याचे कळले आहे. त्यामुळे आंदोलक हे सीएसटीला बसले होते. जेवायला मिळू नये, चहापाणी मिळू नये आणि मराठ्यांनी वैतागून निघून जावे, असे प्रयत्न आहेत, असा आरोपही जरांगे यांनी केला.गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न
    आंदोलकांबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, मराठ्यांची मुले काही म्हणणार नाहीत, ते माज घेऊन नव्हे तर वेदना घेऊन मुंबईत आले आहेत. मी मराठ्यांसाठी बलिदान देण्यासाठी तयार आहे. आता मी मरेन किंवा आरक्षण मिळवेन, असे जरांगे म्हणाले.
    Maharashtra Timesभाजपचा पहिला नेता मनोज जरांगे यांच्या भेटीला, मुंबईत हालचाली वाढल्या
    लोकप्रतिनिधींची उपोषणस्थळी रीघ
    आंदोलनाच्या पहिल्या शुक्रवारी मनोज जरांगे यांची सरकारच्या प्रतिनिधींनी किंवा मंत्र्यांनी भेट घेतली नसली तरी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींची उपोषणस्थळी रीघ लागली होती. खासदार ओमराजे निंबाळकर, बजरंग सोनवणे, भास्कर भगरे, संजय जाधव यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजयसिंह पंडित, अभिजित पाटील, कैलास पाटील, प्रवीण स्वामी, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आदी आमदारांनी उपोषणस्थळी जरांगे यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष विखे-पाटील उपोषणस्थळी जाणार अशी चर्चा होती. मात्र, ते तिथे गेले नव्हते.

    ‘मुख्यमंत्र्यांचे कर्तृत्व काय ?’
    ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्हाला महाराष्ट्राचे संस्कार शिकवत आहेत. त्यांनी त्यांचे कर्तृत्व काय आहे ते सांगावे’, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. ‘फडणवीसांनी धनगरांना फसवले. त्यांच्या आरक्षणाच्या मागणीची पूर्तता केली नाही. कैकाडी समाज पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीत आहे, तर मराठवाड्यात ओबीसीमध्ये आहे. शेतकरी आत्महत्या करतात हे फडणवीसांचे कर्तृत्व’, अशी टीका जरांगे यांनी केली. ‘सरकारने गोरगरिबांची मने जिंकण्याची योग्य वेळ आहे. फडणवीस यांनी आरक्षण दिले तर ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन गुलाल उधळू, असेही जरांगे म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा