“आपण सर्वांनी बघितलं आहे की, आमच्या युती सरकारच्या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. इतर कुठल्याही सरकारच्या काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. आम्ही आरक्षण देण्याचं काम केलं. त्यासोबतच सारथीचं काम केलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करुन उद्योजक निर्माण केले आहेत. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता सुद्धा आम्ही तयार केलेला आहे. विद्यार्थ्यांना परदेशी पाठवण्यालादेखील आम्हीच सुरु केलं आहे. शिक्षण, रोजगार किंवा वेगवेगळ्या योजना आम्ही केलेल्या आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
“मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत. कुठल्याही प्रकारे मराठा समाजा संदर्भात आमच्या मनात शंका नाही. या समाजाच्या आम्ही पाठिशी आहोत. पण त्याचवेळी काही लोकं जाणीवपूर्वक दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत, ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण लागलं पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. काही लोकांचे सकाळी मी स्टेटमेंट बघितले. त्यांचे प्रयत्न काय आहेत ते माझ्या लक्षात येत आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, अशाप्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करु नका. तुमचं तोंड भाजेल. हे मला त्यांना सांगायचं आहे”, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलं.
“शेवटी मुंबई, महाराष्ट्र आपल्याला महत्त्वाचे आहेत. आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो, त्याचा दिर्घकाळापर्यंत परिणाम होत असतो. त्यामुळे अशाप्रकारचे निर्णय चर्चेतून घ्यायचे असतात. सर्वसमावेशकातून घ्यायचे असतात. एकाला समोर करायचं आणि मग दुसऱ्याला नाराज करायचं, मग त्याला समोर करायचं, अशा प्रकारे एकमेकांसमोर झुंझवणं हे या सरकारचं धोरण नाही”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
