Virar Building Collapse News: विरार येथे रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा मागील भाग चाळीवर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 14 जणांना बाहेर काढलं, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
कोसळलेल्या इमारतीच्या अपार्टमेंटमध्ये एकूण 50 सदनिका होत्या त्यापैकी 12 सदनिका कोसळल्या असून, ढिगाऱ्याखाली 15 ते 20 लोक अडकले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांना दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. त्यानुसार वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व रात्रीपासूनच मदत व बचावकार्य सुरू केले.
बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 14 जणांना इमारतीच्या कोसळलेल्या ढिगार्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत 9 जण जखमी आहेत. मृत 3 जणांची ओळख पटली असून 2 जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
लक्ष्मण सिंग (26 वर्ष) , आरोही ओंकार जोवील (24 वर्षे), उत्कर्षा जोवील (1 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. प्रमिला प्रभाकर शिंदे (50), प्रेरणा शिंदे (20), प्रदीप कदम (40), जयश्री कदम (33), मिताली परमार (28), संजय स्वपंत सिंग (24), मंथन शिंदे (19), विशाखा जोवील (24), प्रभावकर (57) अशी दुर्घटनेतील जखमींची नावे आहेत. 3 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, 6 जणांवर उपचार सुरू आहेत.
एन. डी. आर. एफ. ची अतिरिक्त तुकडी अंधेरी येथून घटनास्थळी दाखल झाली असून अग्निशमन दल, स्थानिक पोलिस आणि महानगरपालिका यंत्रणांच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने रमाबाई अपार्टमेंट शेजारील 4 मजली इमारत व आजूबाजूच्या चाळी रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रभावित नागरिकांसाठी समाज मंदिरात तात्पुरते निवारा शिबीर उभारण्यात आले असून, जेवणाची तसेच आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा
